Wednesday, March 30, 2011

फक्त मीच!

तुझ्या देखणेपणावर मरणारे हजार असतिल
पण तुझ्या निर्मळ मनावर मरणारा फक्त मीच!

तुझ्या हसण्यावर फिदा हजार असतिल
पण तुला मनापासून हसवणारा फक्त मीच!

तुझ्या चिडण्यावर चिडणारे हजार असतिल
पण तुला मनसोक्त चिडवणारा फक्त मीच!

तुझ्या सुखात भागिदार हजार असतिल
पण तुझ्या दुःखात हक्काचा भागिदार फक्त मीच!

तुझ्या अदांना पाहणारे हजार असतिल
पण "तूला" पाहणारा फक्त मीच!

तुझ्या कळत तुझ्यावर प्रेम करणारे हजार असतिल
पण तुझ्याच नकळत तुझ्यावर प्रेम करणारा फक्त मीच! फक्त मीच!


-अद्वैत
http://www.marathicorner.com/memberblogs/

Tuesday, March 29, 2011

"सकाळ"नेही घेतली मराठी कॉर्नरची दखल

दिनांक २५ मार्च २०११ च्या सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये मराठी कॉर्नरवर आधारित श्री. प्रफुल्ल सुतार यांचा एक सुंदर रिव्ह्यू छापून आला आहे.

त्याचा दुवा: http://72.78.249.107/Sakal/25Mar2011/Enlarge/Kolhapur/KolhapurToday/page8.htm


कात्रण:



श्री. प्रफुल्ल सुतार यांचे मनापासून आभार. छोट्या पण सुटसुटीत शब्दात त्यांनी खुप सुंदर परिक्षण केले आहे!

-अद्वैत
मराठी कॉर्नर

Thursday, March 24, 2011

आपल्याला अधिकार आहे?


आज २३ मार्च. ८० वर्षांपूर्वी तिघा क्रांतिकारकांना इंग्रज सरकारने फाशी दिली; का तर त्यांना कायमचे संपवून टाकण्यासाठी पण हेच तिघे भारताच्या इतिहासात कायमचे अजरामर झाले. आजचा दिवस शहिद दिन म्हणून ओळखला जातो. शहिद भगतसिंह, शहिद राजगुरू, शहिद सुखदेव यांनी दिलेल्या बलिदानाचे हे जणू प्रतिकच आहे. पण खरच या महान क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आपल्याला आधिकार आहे?

आज न्यूज चॅनल पाहात होतो, शहिद दिनाबद्दल बोलण्यासाठी काही मंत्री आतिशय हापापले होते. कोण म्हणत होता, "वो बहुत बडे वीर थे!" , "हम उनके बदौलत यहा है" वगैरे वगैरे! पण खरच त्यांची लायकीतरी आहे या वीरांबद्दल बोलण्याची? जो देश स्वतंत्र व्हावा म्हणून या लोकांनी हसत हसत बलिदान दिले, अशा या देशात एका खुर्चीसाठी हो्णारे वाद, सामान्यमाणसाला कळूही शकणार नाही इतक्या मोठ्या रकमेचे घोटाळे, भ्रष्टाचार, जातीभेद, नोंदी केल्या तर एखादा ग्रंथ तयार होईल असे प्रकार खरच त्यांच्या या बलिदानाची कुचेष्टा करत आहेत! या सर्व गोष्टींना फक्त आणि फक्त आपणच जबाबदार आहोत! मग त्यांच्या या कर्तुत्वाची आठवण व्यक्त करण्याचा आपल्याला अधिकार आहे?


भगत सिंहांना फाशीला नेत असताना त्यांच्याकडे काही कविता होत्या. त्यातिल एक:

भला निभेगी तेरी हमसे क्यों कर ऍ वायज़
कि हम तो रस्में मोहब्बत को आम करते हैं
मैं उनकी महफ़िल-ए-इशरत से कांप जाता हूँ
जो घर को फूंक के दुनिया में नाम करते हैं।

काय फरक आहे आपल्यात आणि शहिद भगतसिंगांनी रचलेल्या या कवितेत?  "जो घर को फूंक के दुनिया में नाम करते हैं।" . आपण नेमके हेच करतो आहोत असे वाटत नाही?

आज सर्वत्र त्यांच्या फोटोंचे पुजन होत होते, "इंकलाब झिंदाबाद"चे नारे लागत होते पण खरच हा सर्व दिखावेपणा नाही वाटत? भ्रष्ट सरकाराचे जुलुम सहन करून देखिल गप्प बसणारे आपण कोणत्या अधिकाराने या शहिदांच्या बलिदानाची आठवण व्यक्त करतो?

शहिद दिन आणि क्रांतिकारक दिन हे दोन दिवसच हवेत त्यांच्या क्रांतीच्या तेजाची आठवण ठेवण्यास? ज्यांना साधी भारताची प्रतिज्ञा सोडा राष्ट्रगीतही माहित नाही अशा मेट्रोसिटीतल्या तरुणांकडून जणू काही हे दोन दिवस "साजरे" केल्यासारखेच वाटतात! अरे लाज वाटली पाहिजे या अशा दिखावेपणाची!


गप्प आहे देश सारा
गप्प आहे आमचा स्वाभिमान!
नेतृत्वही लज्जास्पद आहे,
भ्रष्ट आहेत भावना!

एकमेकांस दोष देत
माणूसकीही ओशाळली आहे,
बुद्धीजिवी असू खरे पण
ही किड काही संपेना!

व्यर्थ गेले  प्रयत्न आमचे
व्यर्थ गेले आमचे बलिदान,
ही भावना न राहो त्यांच्या मनी
हीच देवा चरणी प्रार्थना!


-अद्वैत

Sunday, March 20, 2011

लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११: निकाल!

नमस्कार,
आज "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चा निकाल घोषित करताना मनापासून आनंद होत आहे. २२ ऑक्टोबर,२०१० ला मराठी कॉर्नरचे उद्घाटन झाले आणि केवळ ४ महिन्यांत मराठी कॉर्नरच्या सभासदांची संख्या १८० हुन अधिक झाली. ही खरच अभिमानाची गोष्ट आहे. कारण केवळ इतक्या कमी वेळेत एवढी लोकप्रियता लाभणे आम्ही भाग्याचे समजतो. आपल्या कविता आणि चारोळी विभागाचे संचालक/मॉडरेटर श्री. आमोल देशमुख यांनी मराठी कॉर्नरवर एखादी स्पर्धा भरवावी असा आग्रह धरला. प्रथम थोडी चिंता वाटली की खरच कितपत यशस्वी ठरेल मराठी कॉर्नरवर एखादी स्पर्धा ? तरिही त्यावर विचार करून, मराठी कॉर्नर टिमशी चर्चा करून "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चे आयोजन करण्यात आले. आणि गर्वाने सांगावेसे वाटते की आपल्या सभासदांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे.

मराठी कॉर्नरवरिल ही पहिलीच स्पर्धा होती पण तरिही जसा उत्तम प्रतिसाद लाभला आहे त्यावरून आम्ही आपल्याला खात्री देतो कि यापुढे वरचेवर अशा स्पर्धा नक्की आयोजित करू.आपला उत्स्फुर्त प्रतिसाद असाच मिळो ही देवा चरणी प्रार्थना.

सर्वप्रथम निकाल जाहिर करण्याआधी आपल्या मान्यवर परिक्षकांचे आम्ही आभार मानतो. या स्पर्धेचे परिक्षण करण्यासाठी आम्हाला श्री.श्रीकृष्ण सामंतजी, श्री. उल्हास भिडेजी व सौ. पल्लवी कुलकर्णीजी यांनी त्यांच्या बिझी शेड्युल मधून वेळ काढला त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू.

सर्व सभासदांनी खुपच छान लेख लिहुन पाठवले आहेत.विषयाची विविधता बघुन खुप छान वाटले.आपल्यातुन फ़क्त एकच लेख निवडणे तसे परिक्षकांची ही खरी परिक्षा होती असे म्हणावे लागेल.दिलेला पहिला नंबर जरी एकाला दिला गेला असला तरी खरे तर सारेच विजयी आहेत.कारण आपण यात सहभाग घेतलात आणि आपल्या मराठी कॉर्नरची शान वाढवलीत.तिला योग्य तो सन्मान दिलात,ह्यातच सर्व सभासदांचे यश सामावले आहेत.आम्हालाही खुप विचार वाचायला मिळाले.आपण सर्वांनीही सर्वांचे लेख वाचुन त्यावर प्रतिक्रीया लिहावी,कारण आपल्या लेखाला काय प्रतिक्रीया आली हे बघणे लेखकाला नक्कीच प्रोत्साहित करते.



"लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चा थोडक्यात सारांश
एकूण सहभागी झालेले लेख : २०
सर्व लेख येथे वाचायला मिळतिल: http://www.marathicorner.com/viewforum.php?f=36

1. संजयचा खून आणि… (कमलेश कुलकर्णी)
2 महिमा अंगठीचा (चेतन सुभाष गुगळे)
3 पिंपातले जगणे आहे आपले (शैलेंद्र शिरके)
4 तुझ्यामुळे .........तुझ्यामुळे (सौ. निवेदिता वाळिंबे.)
5 आमचा बैल भरल्या जाणार आहे (विश्वास भागवत )
6 एअर इंडिया च्या फ्लाईट पर्सरचा धिंगाणा .......दही भाता साठी.(मा. ना . बासरकर. )
7 मराठीसाठी कोपरा ( अरविंद खानोलकर)
8 शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल (प्रकाश पोळ)
9 पूर्वी आणि आता (Kedar Dipak Lasane)
10 द लास्ट किस ! (दीपक परुळेकर)
11 गंधवार्ता.....! (गंगाधर मुटे)
12 २६/११ च्या निमित्ताने.................................. (Nivedita Patil)
13 ओळख --- ' स्व ' ची जाणीव (सौ.बागेश्री प्रशांत येवारे)
14 स्त्री जन्मा.... (प्रमोद सावंत)
15 मानपान (Jayant Aloni)
16 "आपली मराठी (Shraddha Hegiste)
17 लेखमाला स्पर्धा - "असेल रंभा घायाळकर...... पण नाद नाय करायचा (धुंद रवी)
18 विकेट (सागर कोकणे)
19 वसुधालय... माझे साहस! (वसुधा चिवटे)
20 "माज्या मनात आयुष्यभर राहणारी खंत" कमलेश वसंत गायकवाड

आणि विजेता लेख आहे


श्री.चेतन सुभाष गुगळे यांचा महिमा अंगठीचा

पुन्हा लवकरच नवीन उपक्रमा बद्दल नक्की कळवु.आपल्याही सुचनांचे http://www.marathicorner.com/viewforum.php?f=7 इथे स्वागत आहे.
श्री.चेतन गुगळे यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन! त्यांना त्यांचे बक्षिस लवकरच पोच होइल.


पुन:श्च एकदा सर्वांचे अभिनंदन आणि आभार!!!!

कळावे,
मराठी कॉर्नर टिम.

Friday, March 11, 2011

एक उनाड दिवस!

                आज नेहमीप्रमाणे कॉलेजला निघायची तयारी करत होतो. का कोणास ठाऊक मला आज उत्साहच वाटत नव्हता. तरिही गाडीवर टांग मारली आणि स्वारी कॉलेजच्या गेटवर येऊन धडकली. लांबूनच गेट समोर गर्दी दिसत होती, म्हटलं काही तरी लोचा झाला आहे. तेवढ्यात मयर्‍या (मयुर लाडाने मयर्‍या) कंपाऊंडवरून उडी मारून आत जाताना दिसला. त्याला थांबवून काय भानगड झालिये हे माहित करून घेतलं. मॅटर असा होता की आज पासून लेट येणार्‍या विद्यार्थ्याला दंड केला जाणार होता! मी तर नेहमीच लेट जाणारा! च्यायला म्हटलं काय शाळा आहे का इंजिनिअरिंगचे कॉलेज, मयर्‍या पटकन म्हणाला "शाळा" आणि आम्ही दोघे जोरात हसलो. काय मग, लगेच गाडी मित्राच्या रूमवर लावली आणि मी देखिल कंपाऊंडवरून उडी मारून आत शिरलो. दंड भरणे कधी जमलेच नाही राव आपल्याला! ट्रॅफिक पोलिसला ५-७ किलोमिटर पळवून निसटणारे आम्ही कॉलेजचा दंड भरतोय होय? च्छ्या!!

                आधिच कॉलेज करायचा उत्साह नव्हता म्हणून कॉलेजचे तोंड न बघता सरळ कँटिनमध्ये कोण दिसतय का ते पाहायला स्वारी तिकडे वळाली आणि काय आश्चर्य? ज्याला कँटिन म्हणजे काय? हे तरी ठाऊक आहे का माहित नाही असा आमचा विनू दी टॉपर कँटिनमध्ये चक्क निवांत (कोणत्याही नोट्स हातात न घेता) बसलेला दिसला. म्हणून अतिक्युरियोसिटीने त्याला त्याच्या अशा अबनॉर्मल वर्तनाची चौकशी केली तर कळाले की आज पहिले ३ लेक्चर होणार नाहित कारण मेक. डिपार्टमेंटचे कसले तरी वर्कशॉप आहे. वाह! बेस्ट! तेवढ्यात हिरवळ (समझदारोंको इशारा काफी है) शोधत आमची गॅंगदेखिल कँटिनमध्ये आली.

                सगळीच फ्रेष दिसत होती. कारण हेवी लेक्चर्स कँसल झाली होती ना! मग काय चेष्टा मस्करी चालू झाली. लगेच विषय "आज कुठेतरी जाऊया" वर आला. हा विषय आला की एक पुस्तक लिहून होईल इतकी ठिकाणं सुचवली जातात! एक १५ -२० मिनिटांनी सगळ्यांच एकमत पडलं की सौर्‍याच्या (सौरभ लाडाने सौर्‍या) शेतातल्या विहिरीवर पोहायला जायचं! मी सुरूवातिला नाही म्हणत होतो पण माझ्या नकाराला होकारात कन्व्हर्ट करणे यांना मस्त जमतं. थोडापण वेळ न काढता कोण कोण येणार होते असे आम्ही सगळे कँटिनच्या बाहेर पडलो. आता प्रश्न होता कपड्यांचा.घरी जाणे शक्य नव्हते कारण विनाकारण पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार होता. कारण कॉलेज चुकवून उनाडक्या करणे आणि तेही ऑफिशिअली?इंपॉसिबल! शेवटी अंगावरच कपडे वाळवायचे ठरले! शेत होतं १० मैलावर. बारके-जाडे असे सॉर्टाऊट करून ६ गाड्यांवरून १७ लोक सौर्‍याच्या शेताकडे मार्गस्थ झालो.

                   भर दुपारी ११ वाजता एकामागोमाग एक ६ दुचाकी गच्च कोंबून जाताना पाहून सगळे रस्त्यावरचे का कोणास ठाऊक पण "मंगळावरून आले आहेत की काय" अशा नजरेने बघत होते. एक तर महाशय दुसर्‍या बाजूने जात होते, आम्हाला बघून त्यांनी गाडी वळवली आणि आम्हाला पुन्हा गाठून "काय झालं?" विचारण्यासाठी २-३ किलोमिटर उलटे आले होते! काय लोकं असतात राव!

                  आम्ही सौर्‍याच्या शेताकडे चाललोय हे खुद्द सौर्‍यालाही माहित नव्हतं! तेवढ्यात त्याची आठवण झाली.  :D लगेच त्याला फोन केला आणि बोलावून घेतले.डांबरी रस्ता, मुरमाड रस्ता करत करत कच्चा रस्ता लागला. मग काय, गाडीवरच्या प्रत्येक "एक्स्ट्रा पार्सल" उतरवून चालत यायला लावले, सौर्‍याच्या शेतात शेवटी एकदाचे पोहोचलो. अजून गाडी लावतोय तोच निम्मी मंडळी पाण्यात पोहोचली सुद्धा होती.

                  कसली स्वच्छ विहिर होती! काठापासून साधारण १५ फूटांवर पाणी होते. स्वच्छ हिरवेशार पाणी. दुपारचा सूर्य़ मध्यावर आला असल्याने  पाण्याखाली २०-२५ फुटांपर्यंतचे सगळे अगदी स्पष्ट दिसत होते! एकदम व्यवस्थित बांधिव,५०-६० फुट त्रिज्येची मस्त मोठी स्वच्छ विहीर, बाजूला तोडणीसाठी आलेला ऊस, मोहरलेल्या आंब्याची झाडे, कडत उन असूनही मंद गार वारा आणि आम्ही १८ लोक! जबरदस्त वातावरण.

                सुळक्या, गड्डा उडी, पैजेच्या उड्या, बापरे! किती व्हरायटीने विहिरीत उड्यामारत होतो. सौर्‍या आमच्यातला सगळ्यात धष्टपुष्ट माणूस. त्याने एक गड्डा उडी मारली. गड्डा उडी म्हणजे विहिरिच्या काठावरून विहिरित उडी मारल्यानंतर पाण्यात पडायच्या आधी पाय हातांनी गच्च धरून अंगाचा "C" आकार करून घेतलेली उडी. या उडीमुळे पाणी खुप उडते पण सौर्‍या उडी मारल्यानंतर विहिरित काही पाणी शिल्लक राहिलेय का नाही हे बघायला लागेले इतके पाणी उंच उसळले. आधिच पाण्यात आसलेल्या आम्हाला त्याच्या उडीमुळे तयार झालेल्या लाटा "त्सुनामी" आल्यासारख्या अंगावर आल्या! नाकातोंडात पाणी गेले एवढी भारी उडी होती त्याची!

                   पोहायला न येणारी २-३ लोकंही होते आमच्यात पण तारूण्याच रक्त ते! उतरले विहिरित पण पायर्‍यांवरून. मग त्यांना पोहायला शिकवणे, पाण्यात स्वतःच्या "सो कॉल्ड" स्किल्स दाखवणे, एकमेकांना बुडवणे असले सगळे प्रकार करत करत कधी ३ वाजून गेले कळालेच नाही!हळू हळू एकेकाचा स्टॅमिना संपू लागला. साधारण ३:३० पर्यंत सगळे विहिरितून बाहेर पडले.

                    मग आता कार्यक्रम होता "कपडे वाळवणे" ! मस्त उन पडलेलं त्यात वाहणारा मंद वारा, वाजणार्‍या थंडीने हळूच दात एकमेकांवर आपटायला लावत होता. पण त्यातही मजा होती. शेजारच्या शेतातले मस्त मोठे टुणटुणीत ऊस खात, एकमेकांच्या "सुद्रुढ" शरिरयष्टीची चेष्टा करत करत अर्धा एक तास गेला! पुन्हा व्यवस्थित कपडे घालून तयार होऊन परतिच्या प्रवासाला निघालो. तेवढ्यात का कोणास ठाऊक एकदम "ऊसाचा रस" प्यायची हुक्की आली! लगेच गाड्या रसवंती गृहाकडे वळवल्या! "गृह" कुठले, कापड लावून बनवलेली कुटी. चांगला १२-१५ लिटर रस पिला असेल! ३-३ ग्लास प्रत्येकी! :D

                 त्या रस काढणार्‍या मशिनला लावलेले ते घुंगरू, त्यांचा तो नाद, कडक उनात बर्फ घालून ठसका येईल इतका गोड रस, वाह! कसला सॉलिड दिवस संपत होता! वाटत होते हा दिवस कधी संपूच नये! मनात थोडी भितीपण वाटत होती, कारण एकदा "इंजिनिअर" असा शिक्का लागून बाहेरच्या विश्वात स्वतःचे "स्वत्व" शोधण्यास बाहेर पडल्यानंतर असे मित्रांसोबत हूंदडणे जमेल?पहिली गोष्ट असे मित्र पुन्हा मिळतिल? हा असा दिवस परत आपल्या नशिबी कधी येईल? नकळत डोळे पाणावले. मला तंद्रितून जागं करत राहुल्या म्हणाला, "ए अद्व्या आवर लवकर! पुढच लेक्चर गाठायच आहे ! नाहितर सगळा रस जिरेल HOD पकडला तर!". राहुल्याच्या HOD ला उद्देशुन "अरे-तुरे"च्या बोलण्याने हसु आले. हसत हसत पण मनात कोठेतरी आज मित्रांसोबत घालवलेला एक उनाड दिवस आठवत गाड्या पुन्हा कॉलेजकडे वळाल्या!

यारो हम रहे या ना रहे कल ,  याद आयेंगे ये पल! 

-अद्वैत
मराठी ब्लॉग्स

Thursday, March 10, 2011

आज शेवटचा दिवस!

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आणि मराठी कॉर्नर आयोजित पहिल्याच स्पर्धेला सुंदर प्रतिसाद लाभलेल्या  लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ चा आजचा शेवटचा दिवस! आज म्हणजे दिनांक १० मार्च,२०११ रोजी रात्री १२ पर्यंत सहभागी होणारे लेख या स्पर्धेस पात्र ठरतील. आत्तापर्यंत २० लेख आले सुद्धा! मग कोणाची वाट बघताय? लगेच सहभागी व्हा! प्रत्येक सहभागी सभासदाला ई-सर्टिफिकेट देखिल मिळणार आहेच!
स्पर्धेचे नियम येथे वाचायला मिळतिल: http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=36&t=284

मग होताय ना सहभागी?
-अद्वैत

Tuesday, March 8, 2011

डकवर्थ ल्युईस म्हणजे काय रे दादा?

   भारताच्या द.आफ्रिका दौर्‍यावेळी मी आणि माझा छोटा मामेभाऊ मॅच पाहात होतो. द.आफ्रिकेने बर्‍यापैकी स्कोअर केला होता पण पावसाचा व्यत्यय खुप येत होता. मॅच नॅशनलवर होती त्यामुळे स्वच्छ हिंदित कॉमेंट्री सुरू होती. चेतन शर्मा त्याच्या टिपिकल टोनमध्ये सारखा म्हणत होता ," अब भारत को विकेट निकालनेकी जरूरत है! वरना डकवर्थ ल्युईस लगा तो मुश्किले और बढ जायेंगी....." (ज्यांना त्याचा टिपिकल टोन माहित आहे त्यांना वाचताना मजा येइल). २-४ वेळा तेच तेच तो बडबडत होता, तेवढ्यात माझ्या भावाने विचारले "डकवर्थ ल्युईस म्हणजे काय रे दादा?" झालं! आमच्या दांड्या तिथेच उडाल्या ! मी आपलं त्याला "अरे तो एक नियम असतो रे. पाऊस पडला की लावतात. काही नाही रे, शुद्ध बावळटपणा आहे" असे काहिसे सांगुन गप्प केले. पण त्याचा "डकवर्थ ल्युईस म्हणजे काय रे दादा?" हा प्रश्न मनात घोळत राहिला! आणि नेमका चेतन शर्मा जे काही २ तास ओरडत होता तेच झाले. डकवर्थ ल्युईस लागू झाला आणि भारताला मिळेल्या टारगेटमध्ये ४० रन्सची एकूण भर पडली! तेव्हा माझ्या भावाला कळाले की "डकवर्थ ल्युईस हा निव्वळ बावळटपणा आहे!" :D वाटल्याप्रमाणेच भारत ती मॅच हरला पण त्याने विचारलेला प्रश्न काही केल्या डोक्यातून जाईना. लगेचच नेट उघडले आणि त्या पद्धतीबद्दल सविस्तर जाणून घेतले!

         खर म्हणायचं तर तेव्हा कळाले की "डकवर्थ ल्युईस " हा बावळटपणा नसून खरच छान पद्धती आहे. ही पद्धत इंग्लंडचे दोन अंकशास्त्रज्ञ फ्रैंक डकवर्थ आणि टौनी लुईस यांनी शोधली. म्हणून त्याला "डकवर्थ ल्युईस " म्हणतात. ही पद्धत एका गणिती सुत्रावर अवलंबुन आहे. हे सुत्र फ्रैंक डकवर्थ आणि टौनी लुईस यांनी २००२ साली विकसित केलेल्या एका Resource Table वर आधारित आहे. ती सारणी खालीलप्रमाणे आहे:


 

यावरून असे दिसून येते की ही पद्धत उरलेल्या विकेट आणि ओवर यांच्यावर अवलंबून आहे. ही पद्धत सर्वप्रथम भारत आणि पकिस्तान यांच्यात २००६ मध्ये झालेल्या मॅचमध्ये वापरली गेली ज्यामुळे आपण हातातली मॅच हारलो. ही सारणी कळण्यासाठी मी एक उदाहरण देतो. ते उदाहरण समजून घेतल्यावर तुम्हाला याचा वापर कसा करायचा ते कळेल.

           सगळ्यात आधी डकवर्थ ल्युईस चे सुत्र काय आहे ते पाहू. हे सुत्र S*(R)/१०० असे आहे. यातिल S म्हणजे आधिच्या टिमने बनवलेल्या रन्स; R म्हणजे सारणीवरून मिळणारी संख्या. आता समजा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात सामना होत आहे. समजा ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटिंग करून २४० रन बनवल्या (म्हणूनच म्हणालो समजा :D). मग भारत खेळायला उतरला. साधारण २० ओवर खेळल्यानंतर पाऊस पडू लागला. त्यावेळी भारताची स्थिती १०३ रनवर २ विकेट गेल्या अशी आहे. आता समजा अर्धा तास पाऊस पडला म्हणून डकवर्थ ल्युईस  लावणे भाग पडले. मग आता आपण भारताला राहिलेल्या ओवर मधे काढायच्या रन डकवर्थ ल्युईस  सुत्रवापरून काढू.
S=आधिच्या टिमने बनवलेल्या रन्स २४०
R= उरलेल्या ओवर म्हणजे ५०-२०=३०; आता ३० ओवरची रेषा; गेलेल्या २ विकेटच्या रेषेला जिथे मिळते ती संख्या. म्हणजेच ६७.३.
म्हणून भारतासमोर नवे लक्ष= २४०* (६७.३)/१०० =१६२ रन्स (८ विकेट शिल्लक)

हे एक उदाहरण झाले. आता ह्याचे घडलेले उदाहरण घेऊ. मघाशी सांगितल्याप्रमाणे ही पद्धत सर्वप्रथम भारत आणि पकिस्तान यांच्यात २००६ मध्ये झालेल्या मॅचमध्ये वापरली गेली. त्यावेळी भारताने ४९ ओवर मध्ये ३२८ रन्स केल्या. आणि नंतर पाकिस्तानने ७ विकेट वर ४७ व्या ओवर मध्ये ३११ रन्स केल्या होत्या आणि खराब वातावरणामुळे मॅच थांबली. वास्तविक पाहता पाकला ३ ओवर मध्ये १८ रन काढायच्या होत्या पण डकवर्थ ल्युईस वापरला गेला आणि नवे लक्ष ३०४ दिले. जे त्यांनी आधिच पार केले होते. त्यामुळे भारत ७ रन्सनी हारला.

ही सारणी नेहमी नव्याने बनवली जाते. यात काही नियमही लागू केले आहेत. जसे की हा नियम कमित कमी २० ओवरचा खेळ झाल्याशिवाय वापरला जात नाही वगैरे! पण क्रिकेट हा "अनिश्चिततेचा खेळ" आहे. यात काहिही होऊ शकते. हारता हारता एखादी टिम जिंकूही शकते किंवा जिंकता जिंकता एखादी टिम हारूही शकते! त्यामुळे क्रिकेटसारख्या मनमोहक खेळाला या अशा अंकांच्या जाळ्यात पडलेले पाहून बर्‍याच क्रिकेट प्रेमिंनी या पद्धतीवर जगभरातून टिका केली. एवढ्या टिका झाल्या आहेत की सध्या या पद्धतीला पर्यायी पद्धत शोधण्याचे काम सुरू झाले आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे एक पर्याय आलाही आहे जो एका भारतिय इंजिनिअरने अथक परिश्रमाने निर्माण केला आहे. ICC ने देखिल या नव्या पद्धतीची दखल घेतली आहे आणि त्यांनाही ही नवी पद्धत डकवर्थ ल्युईस पेक्षा मजबूत वाटते आहे. आशा आहे माझ्या पुढच्या लेखापर्यंत ती पद्धत रुजू देखिल होईल.

मग आता कळले ना "डकवर्थ ल्युईस म्हणजे काय ते?" :)

-अद्वैत
introduce yourself

Monday, March 7, 2011

शेवटचे ३ दिवस उरले!‏

नमस्कार,
"लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" सध्या मस्त सुरू आहे.ज्या सभासदांनी सहभाग घेतला आहे त्यांचे अभिनंदन. जे सभासद आजुनही ईच्छुक आहेत त्यांच्यासाठी शेवटचे ३ दिवस. या स्पर्धेत दिनांक "१० मार्च २०११" पर्यंत समाविष्ट होणारेच लेख ग्राह्य धरले जातिल. त्यामुळे जे कोणी उत्सुक असतिल त्यांनी त्वरित लेख "http://www.marathicorner.com/viewforum.php?f=36" येथे पोस्ट करावेत.

शेवटी ही एक स्पर्धा आहे. छोटी असो वा मोठी, बक्षिस असो वा नसो पण सहभाग नोंदवणे नक्कीच उपयुक्त असते. त्यामुळे कदाचित तेच विषय देखिल आपण नव्या दृष्टीकोनातुन पाहू लागतो. त्यामुळे खरच या स्पर्धेत सहभाग नोंदवा.  अजुनही वेळ गेली नाही. ३ दिवसांचा वेळ शिल्लक आहे. जर आधिच तुमच्या ब्लॉगवर तुम्ही लेख लिहिला असेल तरी तो इथे चालेल किंवा या ३ दिवसांत तुम्ही सहज एखादा विषय देखिल हाती घेऊ शकता! आणि हो, प्रत्येक सहभागी सदस्याला ई-प्रशस्तिपत्र मिळणारच आहे! :)

 मग सहभागी होताय ना? आणि आजुनही काही शंका असतिल किंवा स्पर्धेबद्दल काही खुपत असेल तर निःसंकोचपणे या marathicorner@gmail.com वर मेल करा. आपल्या शंकेची नक्कीच दखल घेऊ!

Sunday, March 6, 2011

Tour-de-passport office: एक अनुभव! (Part 3)

फक्त ८च काउंटर असताना हे १०वे आले कोठून? म्हणून परत गर्दितून वाट काढत तिथल्या सिक्युरिटी गार्डला विचारले. तो मला बाहेर घेऊन आला आणि त्याने एका रांगेकडे बोट केले. त्याला पुढे विचारणार तोच तो पुन्हा गर्दित कोठेतरी निघून गेला. मग माझी बाहेर ठेवलेली बॅग घेऊन ऑफिस बाहेर पडलो. तिथे एक हवालदार होते. नाव वाचले तर "महाराष्ट्रीयन" होते. म्हणलं चला कोणी तरी मराठी आहे इथे! त्यांना विचारलं तर त्यांनी त्या मघाशच्या इंक्वायरी रांगेकडे बोट केले. मला काहिच कळेना. मी म्हणालो "आहो अत्ता तर तिथेच उभा होतो. तुमच्याच माणसाने मला बाहेर काढून आत नेले. आता आतले साहब म्हणताहेत पुन्हा रांगेत राहू? " आणि तोपर्यंत मी जिथे पहिले उभा होतो त्याच्या मागे पुन्हा ५० लोक उभे होते! आणि रांग अतिशय संथ सरकत होती. त्याक्रमाने माझा नंबर येणे अशक्यच होत. तरिही मी त्या हवलदारांना समजावण्याचा प्रयत्न करत राहिलो तेवढ्यात ते म्हणाले "तुम्ही घरी जा किंवा काहिपण करा! तुमची मर्जी जी ते करा!"  आणि चक्क त्याने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले! !

मग मात्र डोकं सटकलं. अरे ही काय भाषा झाली काय बोलायची? इथे काय मजा म्हणून आलो आहे का एवढ्या लांबून? मान्य आहे की हजार लोकं इथे येतात पण म्हणून काय हे असे बोलायचे आणि असा अपमान करायचा? ज्या परभाषिक गार्डना मनात शिव्या घालत होतो ते मात्र सगळ्यांना आदबिने बोलत होते. भांडकोर माणसांना देखिल व्यवस्थित हाताळत होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अपमान न करता! मग हे महाशय कोण? असतिल पोलिस म्हणून काय झालं?

हा अपमान पचेना! तात्पुरता रांगेत जाऊन जाग धरून उभा राहिलो. लगेच बाबांना फोन केला, घडला प्रकार सांगितला. बाबांनी फक्त एकच विचारलं , "तु ऑफिसमध्ये आहेस की बाहेर पडला आहेस?" ;मी म्हणालो "रांगेत उभा आहे!". झालं!! त्यानंतर बाबांनी जे मला झाडलय ते मी सांगू शकत नाही! त्यांच एकच वाक्य सांगतो "तु भांडायला कधी शिकणार?" झालं! एवढच पुरे होतं! डोकं आधिच भडकलेलं त्यात बाबांनी झाडलेल. काही नाही, मागच्या माणसाला माझी रांगेतली जागा धरायला सांगितलं आणि थेट त्या मिश्यावाल्या गार्डवर सगळा राग काढला! आणि हो! शुद्ध मराठीत! माझा दंगा ऐकून तिथल्या रांगेतल्या काही सदगृहस्थांनी देखिल माझी बाजू घेतली. ही गोष्ट मात्र नवल वाटली. कारण जे काही "पुणेकरांबद्दल" ऐकले होते त्याला साफ तडा दिला या लोकांनी. त्यावेळी अभिमान वाटला पुणेकरांचा.

मग काय तो "बिचारा" गार्ड मागे सरकला आणि त्याने दुसर्‍या गार्डला बोलावून मला आतून १० नंबर काऊंटरकडे नेले. माझा मलाच आतून अभिमान वाटत होता! काय भांडलो सॉलिड आपण!  :D , तिथल्या साहेबांनी फक्त १० मिनिटांत माझी कागदपत्रे तपासली, "रिसिव्हड" असा शेरा मला आलेल्या पत्रावर दिला आणि मला जाण्याची परवानगी दिली. तरी मी पुन्हा पुन्हा २-४ वेळा "मला परत यावे लागणार नाही ना?" विचारून खुंटा बळकट केला! मग काय मस्त छाती पुढे काढून ऐटित अगदी एखादा किल्ला जिंकल्यासारखा ऑफिसमधून बाहेर पडलो. पहिले बाबांना फोन करून काम झाल्याचे सांगितले आणि स्पेसिफिकली "भांडलो" या शब्दावर जोर दिला! :) मग लगेच मिळेल ती गाडी धरून स्वारगेट आणि नंतर घर!

अशी झाली माझी "Tour-de-passport office" . एक वेगळाच अनुभव देऊन गेली. एका दृष्टीने खुप काही शिकवूनही गेली; "जर तुम्ही सत्य असाल तर बिनधास्त असत्याचा विरोध करा;आपल्या हक्कासाठी लढा". हा अनुभव नक्किच मला माझ्या पुढच्या आयुष्यात उपयोगी पडणार यात काही शंकाच नाही.

तर हा झाला माझा अनुभव! कदाचित तुम्हाला याहुनही वेगळा; चांगला किंवा कदाचित याहुनही वाईट अनुभव आला असेल. तर तुमचे अनुभव नक्की इथे कमेंटस मध्ये शेअर करा!
-अद्वैत
marathi

Friday, March 4, 2011

Tour-de-passport office: एक अनुभव! (Part 2)

ठरवल्याप्रमाणे वेळ काढून १ तारखेला जायचे निंश्चित केले. सकाळी १० ते १२ अशीच वेळ असल्याने पुण्यात मुक्काम करावा लागणार हे फिक्स होते. म्हणून आदल्या दिवशी म्हणजेच २८ फेब. ला मिळेल ती गाडी धरून जायचे पक्के केले. एक प्रकारचा उत्साह होता. कारण अशी वन डे ट्रिप या आधी एकट्याने पुण्याला कधीच केली नव्हती. थोडी मजापण वाटत होती. कारण पुण्याचे पासपोर्ट ऑफिस पाहणार होतो ना! खुप अपेक्षा होत्या. ऑफिस असे असेल, एवढे असेल वगैरे वगैरे!

२८ ला रात्री १० ला मामाकडे पोहोचलो. रिक्षावाल्याने गंडवण्याचा प्रयत्न केला पण आधिच सावध असल्याने त्याचा इरादा मी हाणून पाडला! :D  जेवण वगैरे आटोपल्यावर मामा म्हणाला "तुला ९:३०लाच जावे लागेल. खुप गर्दी असते! नंबर लवकर मिळाला तरच काम होईल. नाहितर पुन्हा दुसर्‍या दिवशी जावे लागेल." दुसर्‍या दिवशी "महाशिवरात्री" होती. त्यामुळे ऑफिसला सुट्टी. आणि ३ तारखेपर्य़ंत थांबणे मला शक्य नव्हते! त्यामुळे १ तारखेला सकाळी ९:३० ला रिक्षाने पासपोर्ट ऑफिसला पोहोचलो. जाताना वाटेत पुण्याची सकाळ पाहिली. सगळीकडे गडबड, कलकलाट, गाड्या, चिल्ली-पिल्ली कोंबून भरलेल्या रिक्षा, नोकरदार वर्गांचे त्रासलेले चेहरे, बापरे! इथे राहणे माझ्यासारख्या गावातून आलेल्याला पटतच नाही. आपण बरे नि आपले गाव बरे! :)

रिक्षातून उतरल्यावर ती पासपोर्ट ऑफिसची बिल्डिंगबघून एक गाणे आठवले, "खन से जो टुटे कोई सपना, जग सुना सुना लागे..." :D काय राव! काय ती अवस्था! इतक्यात आत डोकाउन पाहिले! अबबब...! मारुतीच्या शेपटा एवढी ती रांग. अंदाजे ३००-४०० लोक होते तिथे. ९:३० ला ही अवस्था तर १० नंतर काय होत असेल याची कल्पना करून अंगावर काटा आला. आत गेल्यावर दिसले किती ते दारिद्र्य. तोपर्य़ंत मी जी काही "पासपोर्ट ऑफिस"ची कल्पना केली होती ती पार चिंध्या झाली! २-४ रांगांत लोक उभे होते. कोठे उभाराहावे ते कळेना म्हणून तिथल्या एका भारदार मिश्याच्या सेक्युरिटी ऑफिसरला विचारले तर तो हिंदीतुनच बोलू लागला. मी तरिपण मराठीच बोलत होतो कारण आमचं हिंदी म्हणजे "वो समुद्रमे पड्या और पोहके काठपर आया" या लेवलचे. पण गडी हिंदी काही सोडेना. म्हणून दुसर्‍या गार्डला विचारले तर तो पण हिंदीच. झालं! डोक्यात "मनसे"पणा संचारला पण मला गरज होती म्हणून मोडकं तोडक हिंदी बोलून रांग विचारली. जे नको होते तेच झाले. त्याने तिथल्या सगळ्यात मोठ्या "इंक्वायरी" रांगेकडे बोट केले.

नशिबाला दोष देत गप उभा राहिलो तिथे. अंदाजे माझ्यापुढे ६०-७० लोक असतिल. एक अर्धा तास उभा राहिलो; तेवढ्यात काही पुणेरी लोकांचे "सुसंवाद" सुरू झाले. विषय होता रांगेतली त्यांची जागा. मी सरळ दुर्लक्ष करत मोबाईल खेळत बसलो. तेवढ्यात एक गार्ड लाईन सरळ करायला आला. मी तोपर्य़ंत आणलेली कागदपत्रे आणि पत्रात सांगितलेली कागदपत्रे यांची वारंवार तपासणी करत होतो. तेवढ्यात त्याने माझ्या हातातले पत्र पाहिले आणि म्हणाला "आप इधर क्यो खडे हो? वाहासे डाइरेक्ट अंदर जाओ". आणि एक आनंदाचा धक्का! झपकन सगळी कागदपत्रे बॅगेत कोंबली आणि ते पत्र तिथल्या गार्डला दाखवून सरळ आत गेलो. छान वाटत होतं. कारण नंबर येऊ पर्यंत निदान ११ तरी वाजलेच असते.

जेवढी लोकं बाहेर होती तेवढीच किंबहुना जास्तच लोकं आत होती. सगळीकडे गरम होत होते. आतल्या गार्डने मला एका रांगेत क्रमाने बसायला सांगितले. जवळ जवळ अर्धातास झाला तरी ते साहेब आले नव्हते. साधारण ११च्या सुमारास साहेब आले. मग एक-एक करत करत ११:३० वाजता मी आत केबिनमध्ये गेलो. त्यांना ते मला आलेले पत्र दिले आणि सांगितलेली कागदपत्रे काढूपर्यंत त्यांनी ते पत्र मला परत दिले आणि म्हणाले "१० नंबर काउंटरवर कागदपत्रे सबमिट करा". मला थोडे नवलच वाटले. त्यांनी ते पत्र पाहिले तरी का? याची शंका होती पण कदाचित त्यांना सवय असेल असे मानून मी केबिनच्या बाहेर पडलो. आणि ते बरोबरच असणार. कारण दररोज माझ्यासारखे पत्र आलेले ढिग लोक निःश्चितच येत असणार.ते ऑफिस म्हणजे अक्षरश: खुळ्यांचा बाजार वाटत होता! काय ती गर्दी, ते "सुसंवादा"चे आवाज. त्यातुन वाट काढत १० नंबर काउंटर शोधत पुढे जात होतो. पण तिथे तर फक्त ८च काउंटरस होती.
क्रमश:

Tuesday, March 1, 2011

Tour-de-passport office: एक अनुभव! (Part 1)

एप्रिल २०१० दरम्यान गावातल्याच एका एजंटला धरून "मिशन पासपोर्ट" सुरू केले. आई,बाबा आणि माझा अश्या तिघांचे पासपोर्ट काढण्याची जबाबदारी त्याला दिली. शेवटी एजंटच तो, थोडे खिसे गरम करावे लागले पण आशा होती काम सुखाने पार पडेल. त्यानेही अगदी उत्साहात कामाचा श्रीगणेशा केला. लागलीच फॉर्म भरून घेतला, हवी असलेली डॉक्युमेंट्सची लिस्ट दिली, आम्हीही तातडीने सर्व कागदपत्रे त्याच्याकडे सुपुर्त केली. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला जवळ-जवळ १ महिना गेला. पण खुष होतो कारण पासपोर्ट येणार होता.एजंटने सांगितले, " काहिनाही बगा सायेब, जास्तीत जास्त दोन महिनं लागतिल बगा पुलिस इंक्वायरी यायला आनि त्यानंतर १ मइन्यात पासपोर्ट तुमच्या हातात!". चला म्हटलं एकदाची काम झाले.

२ महिने झाले,३ महिने झाले आजुन काही पत्ता नाही पोलिस इंक्वायरीचा. शेवटी ४ महिन्यांनी बाबांनी त्याला फोन केला तर माहाशयांचे उत्तर, "अवो काय करनार सायेब, ते नवं आपिसर आलय आन त्यानं सगळी डोक्योमेन्टस परत पाठवलियेत. आता मी त्यी परत पाठवालोय". त्यावेळी थोडी भिती वाटली कारण सगळी ओरिजिनल डॉक्युमेंटस त्याच्याकडे होती, पण त्याने सांगितल्याप्रमाणे त्यानंतर २ महिन्यांनी पोलिस इंक्वायरी झाली, सगळे कागद तपासून साहेबांनी केस "क्लिअर" केली आणि सांगितले की २ महिन्यांत पासपोर्ट मिळेल.

त्यादिवसानंतर पासपोर्ट स्टेटस रोज बघायचा जणू नादच लागलेला. साहेबांनी सांगितल्यानुसार एक-दिड महिन्यांनी आई आणि बाबा दोघांचे स्टेटस बदलून "Passport is dispatched" असे झाले पण आजून माझा स्टेटस "Police inquiry is pending" असाच होता. २ आठवड्यात दोघांचे पासपोर्ट आलेपण, पण माझ्या स्टेटसमध्ये काहिच बदल नाही. थोडी चिंता वाटली म्हणून पोलिस ठाण्यात जाऊन साहेबांची गाठ घेतली तर कळाले की माझी कागदपत्रे फेरपडताळणीसाठी आली आहेत! आणखी एक धक्का! पण साहेबांनी काही त्रास दिला नाही, लगेच पुन्हा क्लिअर करून पाठवली.

गेल्या महिन्यात म्हणजे साधारण २२-२३ जानेवरी २०११ दरम्यान स्टेटस बदलून "Passport will dispatched on 28th January 2011" असा आला! खूप आनंद झाला! नंतर २८ तारिख गेली, २९ गेली, असे करत करत २० फेब्रुअरी आली पण स्टेटस आजून तसाच. पोस्टात जाउन आलो तर तिथेही पासपोर्ट आला नव्हता. पण २१ तारखेला एक पत्र आले. पासपोर्ट ऑफिसकडून होते ते! आणि त्यात लिहिले होते की "तुमच्या राहत्या पत्त्याची पडताळणी पुणे पासपोर्ट ऑफिसमध्ये सोम-शुक्रवार सकाळी १० ते १२ या दरम्यानच येऊन पूर्ण करावी. ही पुर्तता तीस दिवसांच्या आत न झाल्यास तुमची फाईल बंद केली जाईल!". लागलीच मी पत्रावरची तारिख बघितली तर ती १७/१/२०११ अशी होती! आणखी एक धक्का! कारण ते पत्रच मला ३४ दिवसानंतर मिळालेलं! म्हणले ३० दिवसाची मुदत मला ते पत्र मिळण्याआधीच उलटून गेली होती!  मला कळायचेच बंद झाले! हा काय प्रकार! २०-२५ डॉक्युमेंटस देऊन देखिल पुन्हा पत्त्याच्या पडताळणीसाठी तिच डॉक्युमेंटस घेऊन जायची? तेही अडिचशे किलोमिटरचा प्रवास करून? आणि फाईल चालू ठेवली आहे याची शाश्वती नाहीच! पण काहीही झाले तरी पासपोर्टचे काम होते म्हणून जायचे निश्चित केले!

क्रमश:

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...