Showing posts with label कॉलेज लाईफ. Show all posts
Showing posts with label कॉलेज लाईफ. Show all posts

Monday, April 2, 2012

हे दिवस परत कधी येणार???


अंड्याची हुशारी पुन्हा कधी अनुभवणार?
अन राजाची दादागिरी कोण विसरणार?
बंड्याचा "इमोशनल" झटका कोण सहन करणार?
अज्याचा वैचारिक फटका कोण विसरणार??
खरच हे दिवस परत कधी येणार???

राहुल्याटी सारखे "इ-अपडेट्स" कोण पुरवणार?
टंग्याच्या टंग्या कोण पचवणार?
पोप्या चॅटिंग कधी सोडणार?

खरच हे दिवस परत कधी येणार???

श्यागीच्या भन्नाट जोक्सवर पुन्हा कधी हसणार?
शितल्याचे "वन साईडेड फोटो" कोण काढणार?
धन्याच्या लॉजिकला चॅलेंज कोण देणार?
खरच हे दिवस परत कधी येणार???

किर्ल्याला कोणती आयटम मिळणार?
दिप्याला सर्टिफिकेट्स कशाचे मिळणार??
सेनाला ड्रायविंग कोण शिकवणार??
खरच हे दिवस परत कधी येणार???

आश्याच्या शिव्या कोण खाणार?
पशाला कोणता "डाव" आवडणार?
म्हैशाचं भविष्य कोण ऐकणार?

खरच हे दिवस परत कधी येणार???

अमल्याच "सचिन प्रेम" कोण सहन करणार?
मैर्‍याचं भन्नाट हास्य पुन्हा कधी ऐकणार?
अमर्‍या सबमिशन गुरु पुन्हा कधी होणार?
अन रंज्याच्या "स्किमा" कोणाला कळणार?
खरच हे दिवस परत कधी येणार???

सद्या नेमका कोणासोबत सेटल होणार?
बिल्डरला टिप्स कोण विचारणार?
विशल्याला खरं प्रेम कधी भेटणार
अन तेज्याचा जुना आवाज कधी ऐकणार?
खरच हे दिवस परत कधी येणार???

खुंख्याचे पॉईंट कोणाला कळणार??
राहुल्याएनला कॅज्युल मधे कधी बघणार?
वर्ध्यासारखी शांत व्यक्ती कधी भेटणार?
अन निर्‍याला कोण सांभाळणार??
खरच हे दिवस परत कधी येणार???


बघता बघता दिवस हे असे सरले,
न कळत अश्रू डोळ्यांत उरले.
दुःख म्हणू की काय मलाच कळत नाही,
पण तुम्हांसारखे "यार" सर्वांनाच मिळत नाहीत!



-अद्वैत उमेश कुलकर्णी

Monday, January 9, 2012

ड्रिमगर्ल.....!

सकाळ-सकाळी मस्त पेपर वाचत पडलो होतो. आजचे राशीभविष्य  "वाद संभवतात. वाहने सावकाश चालवा. आर्थिक लाभ संभवतो. एकतर्फी प्रेमात निराशा संभवते" आणि तेवढ्यात मोबाईल वाजयला लागला. आतल्या काचेच्या कपाटात ठेवला होता. कोणत्यातरी मित्राचाच असणार असे मानून तो उचलायला म्हणून उठलो. प्रोजेक्टचे काम सुरू आहे त्यामुळे त्यासंबंधीच काहितरी असणार असा डोक्यात काहिसा विचार येऊन गेला. मोबाईल बाहेर काढून कोणाचा आहे हे बघीतलं आणि दोन मिनिट बधीरच झालो. तो तीचा फोन होता! हो! खरच तीचा फोन होता. मी पुन्हा-पुन्हा स्पेलिंग चेक केलं, ते तिचच नाव होतं......

आपलं मन किती वेगात धावतं नाही? तो फोन वाजत असताना माझं मन तिच्या विचारातच बुडून गेलं. तिने आज पहिल्यांदाच स्वतःहुन फोन केला होता. तसा मीही थोडा लाजराच, त्यामुळे स्वतःहुन मीही कधी तिला फोन करत नाही पण एवढ्या सकाळी तिने फोन केला हा थोडा धक्काच होता. एकीकडे मन मस्त स्वप्नं बघत होतं आणि अचानक एका विचाराने सगळा काळ स्तब्ध झाल्यासारखा वाटला. मघाशी वाचलेलं भविष्य आठवलं!!  आजचे राशीभविष्य ;एकतर्फी प्रेमात निराशा संभवते. 

"माझ्या तिच्या विषयीच्या feelings तिला कळाल्यातरी नाहीत ना?" हाच प्रश्न डोक्यात अचानक पैदा झाला. काहीच कळत नव्हतं.  तसं झालं असेल तर हा कॉल तिने चिडून तरी केला नसेल ना? आणि सांगितलं तरी कोणी सांगितलं? कारण तिच्या बद्दलच्या माझ्या feelings मला आणि माझ्या बेस्टफ्रेंडसनाच माहितीयेत आणि त्यांच्याकडून तिला कळणं तसं अशक्यच. आणि ती जर खरच चिडली असेल तर ती आमची इतक्या वर्षांची मैत्री तरी तोडणार नाही ना? माझ्या एका बावळटपणामुळे  खरच माझी एक मैत्रीण मी गमावणार तरी नाही ना? अशा असंख्य प्रश्नांनी डोक्यात घरं करायला सुरूवात केली.

तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजून वाजून बंद झाली. मी थोडासा बिथरलेलो. त्यामुळे फोन miss झाल्याचा किंचित आनंदच झाला. मनाची तयारी करत होतो. चिडली असेल तर कशी समजूत घालायची..... कशी माफी मागायची... वगैरे वगैरे! तेवढ्यात पुन्हा फोन वाजयला लागला. पुन्हा तिचाच होता. मनाशी ठरवलं की काहीही होऊदे फोन उचलायचाच.

थोडा घाबरत घाबरतच उचलला...

"हॅलो! अद्वैत?"
स्स्स्स्स्स्स!! तिचा तो मस्त नाजूक आवाज! वाटलं ऐकतच राहावं, बोलूच नये!
"हहह... हॅलो!"
"हॅलो! कायरे? कुठे गायब होतास? फोन का उचलला नाहीस?"
"ते मी, मी, ते, जरा बबब..बाहेर होतो."
"बरा आहेस ना? असा का अडखळतो आहेस?"
"नाही तसं काही नाही, मी मस्त आहे. बोल काय काम काढलस?"
"का रे? कामाशिवाय कॉल करू शकत नाही काय कोणी?"

आता मला काहीच सुचत नव्हतं. एक तर असा अचानक कॉल आणि त्यात ती चिडल्यासारखीही वाटत नव्हती. आणि आतातर अगदी जीवाभावाची मैत्री असल्यासारखी बोलत होती. का कोणास ठाऊक पण थोडं awkward वाटत होतं. कारण माझ्या फोनला आणि माझ्या कानांना असल्या नाजूक शब्दांची सवयच नाही! कारण मला कॉल करणारे माझे परम् मित्रलोक एखादी सणसणीत कोल्हापूरी शिवी घातल्याशिवाय पुढे बोलतच नाहीत. तशी स्टाईलच आहे इकडे. त्यामुळे हे असे शब्द जरा नविनच होते.

"अगं तसं नाही ग! आज पहिल्यांदाच कॉल केलास ना! म्हणून मला वाटलं काही काम काढलस काय माझ्याकडं"
"अरे नाही रे. कॉलेजचे जुने फोटो बघत होते. तु दिसलास. So आठवण झाली म्हणून केला कॉल. तु काय कधी करत नाहीस, मग म्हटलं मीच करावा!"

आतातर मी जाम खाली पडायचाच राहिलो होतो. हे काय घडतय माझ्यासोबत? आठवण? आणि तिला? आणि तीही माझी? अरे हे काय नेमकं चाललय तरी काय?

"माझी आठवण? काहीच्या काही! एवढं आमचं नशीब कुठे? बाय द वे कोणते फोटो?"
"तुम्हाला येत नसली तरी आम्हाला येते आमच्या फ्रेंड्सची आठवण. अरे ते फोटो आपल्या फर्स्ट इयरच्या कार्यक्रमाचे आहेत रे. काहीतरी समाजसेवा करायला गेलो होतो की आपण सगळे जवळच्या गावी. तिथले आहेत. सहज कपाट आवरताना दिसले. बोल, आणखी काय चालू आहे सुट्टीत?"
"अरे बापरे! ते फोटो आहेत होय तुझ्याकडं! ग्रेट! बाकी काही नाही बघ ! निवांत आहे. सध्या प्रोजेक्टचे काम जोरात सुरू आहे. फुल्ल बिझी आहे त्यात. कदाचित या सेमिस्टरला कॉलेज करणारही नाही. बहुतेक तशी परवानगी मिळेल आम्हाला कॉलेजकडून कारण तसा प्रोजेक्ट आहेचे आमचा!"
"भारीये बुवा तुमचं"
"मग? वाटलो काय तुला आम्ही?"
"मी तरी एक दिवस सुद्धा कॉलेज बंक करणार नाही. आफ्टरऑल लास्ट सेमिस्टर आहे आपली. पुन्हा आयुष्यात कुठे कॉलेज करणारे? आणि कोण फ्रेंड कुठे भेटेल किंवा भेटेल की नाही हे काहीच सांगता येत नाही."
"हम्म्म.. खरय तुझ! आम्ही तरी सध्या फुल्ल एंजॉय करतोय बघ! बाकी ? बोल आणखी काय नविन?"
"काही नाही. भरपुर शॉपिंग केली या वेळी. बाबांच्या खिशाला मोठी कात्री लावली. भरपुर ड्रेस घेतले. ज्वेलरी घेतली. नुसती खरेदी केली."
वगैरे , वगैरे....
असे इकडचे-तिकडचे भरपुर बोलणे झाले. माझा मलाच विश्वास बसत नव्हता की मी एखाद्या मुलीशी बोलू शकतो आणि तेही अर्धा तास? सटर-फटर गप्पा झाल्यानंतर तिच्या एका वाक्याने मी सुन्न झालो...

"मग कधी भेटुयाल?"

मी खरच नीट ऐकलं ना? की माझे कान वाजले?

"काय म्हणालीस?"
"अरे मी म्हणाले कधी भेटुयात? बरेच दिवस झाले भेटलो नाहीत आपण."


आता मात्र माझी अवस्था बघण्यासारखी होती. माझ्या फिलिंग्स तिला नक्की कळाल्या आहेत आणि बहुतेक तिचाही होकार आहे असा काहिसा विचारही मनात येऊन गेला पण परत मनाला आवरलं! उगाच तिच्या मनात निर्मळ मैत्री असेल आणि माझ्या या बावळटपणामुळे त्यावर मला पाणी पडू द्यायच नव्हतं.

"भेटुयाल? बरी आहेस ना? असच एकदम काय सुचलं? "
"अरे काही नाही. असच वाटलं भेटावसं. म्हणून. आणि तुला काही हरकत असेल तर राहुदे"

हरकत? आणि मला? ती कशाला असेल?

"अगं नाही नाही. तसं नाही. मी कॉलेजला दररोज येतोचे प्रोजेक्टसाठी. भेटूयाल कॅंटिनमधे!" 
"ए.. नाही. कॅंटिनमधे नाही. तुझ्या त्या ग्रुपने आपल्याला पाहिलं तर गावभर करतील आणि काहीपण चिडवतील"
"ए! तसे नाहीयेत माझे मित्र. तशी चेष्टा चालायचीच की. असो! तुला नको असेल तर राहुदे. नको कॅंटिन. मग कुठे भेटायच?"
"उद्या संध्याकाळी ६ वाजता CCD ला"

Cafe Coffee Day? तेही आम्ही दोघं? म्हणजे थोडक्यात Date वर जायच? धक्यांवर धक्के! अरे काय चाललय काय?

"ठिके. मी येतो."
"ग्रेट. मग भेटु उद्या! chal bye Cya take care"

फोन बंद झाला होता!पण तो तसाच कानाला धरून ठेवावा वाटत होता. तिचा एकन एक शब्द कानात घुमत होता. हे माझ्याबाबत घडलयं याचं feeling काहीतरी वेगळच होतं.

दिवस कधी संपतोय आणि कधी एकदा उद्याची संध्याकाळ येते असं झालं. कसा बसा दिवस संपला. आणि बघता बघता ती संध्याकाळही आली. बरोबर ६ वाजता मी CCD मध्ये मस्त तयार होऊन आलो. अजुन ती यायची होती. येताना तिच्यासाठी एक मस्त फ्रेंडशीपवर आधारित ग्रिटिंग घेतलं. दोघांच्यासाठीचाच असलेला टेबल धरून तिची वाट पाहत बसलो.

तेवढ्यात हाक ऐकू आली,

"अद्वैत! अरे अद्वैत. राजा उठ"

आई???????????? इकडे????? तिला कोणी सांगितलं? मी तर गुपचुप आलोय निघुन? मग ती इकडे कशी? आणि उठ का म्हणतिये?

"अरे बघ साडेनऊ वाजले. कितीवेळ झोपशील"

आणि गदागदा मला तिने हलवल... मी ताडकन उठून बसलो. मला काहीच कळत नव्हतं. वर पंखा, शेजारी PC , बाजूला खिडकी आणि खाली...... खाली गादी??? बोंबला! म्हणजे मी स्वप्न बघत होतो. लगेच मोबाईल चेक केला. कॉल हिस्टरी चेक केली, त्यात तिचा कॉल आल्याची कोणतिही नोंद नव्हती. म्हणजे हे सगळ माझं स्वप्न होत? अरेरेरेरेरेरेरे!! भयानक वाईट वाटलं ! आई माझ्याकड शंकेने बघत म्हणाली,

"काय झालं रे? असा चेहरा का पडलाय? काय वाईट स्वप्न पडलं होतं का?"

वाईट??????? अगं आई काय स्वप्न पडलं होतं ते तुला कसं सांगू!! अंग जड झाल्यासारख वाटत होतं. कसाबसा बिछान्यावरून उठलो. तेवढ्यात शेजारच्या दुकानातल्या रेडिओवर गाण लागलं,

"छनसे जो टुटे कोई सपना.........
जग सुना सुना लागे... जग सुना सुना लागे रे................"

-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

Friday, March 11, 2011

एक उनाड दिवस!

                आज नेहमीप्रमाणे कॉलेजला निघायची तयारी करत होतो. का कोणास ठाऊक मला आज उत्साहच वाटत नव्हता. तरिही गाडीवर टांग मारली आणि स्वारी कॉलेजच्या गेटवर येऊन धडकली. लांबूनच गेट समोर गर्दी दिसत होती, म्हटलं काही तरी लोचा झाला आहे. तेवढ्यात मयर्‍या (मयुर लाडाने मयर्‍या) कंपाऊंडवरून उडी मारून आत जाताना दिसला. त्याला थांबवून काय भानगड झालिये हे माहित करून घेतलं. मॅटर असा होता की आज पासून लेट येणार्‍या विद्यार्थ्याला दंड केला जाणार होता! मी तर नेहमीच लेट जाणारा! च्यायला म्हटलं काय शाळा आहे का इंजिनिअरिंगचे कॉलेज, मयर्‍या पटकन म्हणाला "शाळा" आणि आम्ही दोघे जोरात हसलो. काय मग, लगेच गाडी मित्राच्या रूमवर लावली आणि मी देखिल कंपाऊंडवरून उडी मारून आत शिरलो. दंड भरणे कधी जमलेच नाही राव आपल्याला! ट्रॅफिक पोलिसला ५-७ किलोमिटर पळवून निसटणारे आम्ही कॉलेजचा दंड भरतोय होय? च्छ्या!!

                आधिच कॉलेज करायचा उत्साह नव्हता म्हणून कॉलेजचे तोंड न बघता सरळ कँटिनमध्ये कोण दिसतय का ते पाहायला स्वारी तिकडे वळाली आणि काय आश्चर्य? ज्याला कँटिन म्हणजे काय? हे तरी ठाऊक आहे का माहित नाही असा आमचा विनू दी टॉपर कँटिनमध्ये चक्क निवांत (कोणत्याही नोट्स हातात न घेता) बसलेला दिसला. म्हणून अतिक्युरियोसिटीने त्याला त्याच्या अशा अबनॉर्मल वर्तनाची चौकशी केली तर कळाले की आज पहिले ३ लेक्चर होणार नाहित कारण मेक. डिपार्टमेंटचे कसले तरी वर्कशॉप आहे. वाह! बेस्ट! तेवढ्यात हिरवळ (समझदारोंको इशारा काफी है) शोधत आमची गॅंगदेखिल कँटिनमध्ये आली.

                सगळीच फ्रेष दिसत होती. कारण हेवी लेक्चर्स कँसल झाली होती ना! मग काय चेष्टा मस्करी चालू झाली. लगेच विषय "आज कुठेतरी जाऊया" वर आला. हा विषय आला की एक पुस्तक लिहून होईल इतकी ठिकाणं सुचवली जातात! एक १५ -२० मिनिटांनी सगळ्यांच एकमत पडलं की सौर्‍याच्या (सौरभ लाडाने सौर्‍या) शेतातल्या विहिरीवर पोहायला जायचं! मी सुरूवातिला नाही म्हणत होतो पण माझ्या नकाराला होकारात कन्व्हर्ट करणे यांना मस्त जमतं. थोडापण वेळ न काढता कोण कोण येणार होते असे आम्ही सगळे कँटिनच्या बाहेर पडलो. आता प्रश्न होता कपड्यांचा.घरी जाणे शक्य नव्हते कारण विनाकारण पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार होता. कारण कॉलेज चुकवून उनाडक्या करणे आणि तेही ऑफिशिअली?इंपॉसिबल! शेवटी अंगावरच कपडे वाळवायचे ठरले! शेत होतं १० मैलावर. बारके-जाडे असे सॉर्टाऊट करून ६ गाड्यांवरून १७ लोक सौर्‍याच्या शेताकडे मार्गस्थ झालो.

                   भर दुपारी ११ वाजता एकामागोमाग एक ६ दुचाकी गच्च कोंबून जाताना पाहून सगळे रस्त्यावरचे का कोणास ठाऊक पण "मंगळावरून आले आहेत की काय" अशा नजरेने बघत होते. एक तर महाशय दुसर्‍या बाजूने जात होते, आम्हाला बघून त्यांनी गाडी वळवली आणि आम्हाला पुन्हा गाठून "काय झालं?" विचारण्यासाठी २-३ किलोमिटर उलटे आले होते! काय लोकं असतात राव!

                  आम्ही सौर्‍याच्या शेताकडे चाललोय हे खुद्द सौर्‍यालाही माहित नव्हतं! तेवढ्यात त्याची आठवण झाली.  :D लगेच त्याला फोन केला आणि बोलावून घेतले.डांबरी रस्ता, मुरमाड रस्ता करत करत कच्चा रस्ता लागला. मग काय, गाडीवरच्या प्रत्येक "एक्स्ट्रा पार्सल" उतरवून चालत यायला लावले, सौर्‍याच्या शेतात शेवटी एकदाचे पोहोचलो. अजून गाडी लावतोय तोच निम्मी मंडळी पाण्यात पोहोचली सुद्धा होती.

                  कसली स्वच्छ विहिर होती! काठापासून साधारण १५ फूटांवर पाणी होते. स्वच्छ हिरवेशार पाणी. दुपारचा सूर्य़ मध्यावर आला असल्याने  पाण्याखाली २०-२५ फुटांपर्यंतचे सगळे अगदी स्पष्ट दिसत होते! एकदम व्यवस्थित बांधिव,५०-६० फुट त्रिज्येची मस्त मोठी स्वच्छ विहीर, बाजूला तोडणीसाठी आलेला ऊस, मोहरलेल्या आंब्याची झाडे, कडत उन असूनही मंद गार वारा आणि आम्ही १८ लोक! जबरदस्त वातावरण.

                सुळक्या, गड्डा उडी, पैजेच्या उड्या, बापरे! किती व्हरायटीने विहिरीत उड्यामारत होतो. सौर्‍या आमच्यातला सगळ्यात धष्टपुष्ट माणूस. त्याने एक गड्डा उडी मारली. गड्डा उडी म्हणजे विहिरिच्या काठावरून विहिरित उडी मारल्यानंतर पाण्यात पडायच्या आधी पाय हातांनी गच्च धरून अंगाचा "C" आकार करून घेतलेली उडी. या उडीमुळे पाणी खुप उडते पण सौर्‍या उडी मारल्यानंतर विहिरित काही पाणी शिल्लक राहिलेय का नाही हे बघायला लागेले इतके पाणी उंच उसळले. आधिच पाण्यात आसलेल्या आम्हाला त्याच्या उडीमुळे तयार झालेल्या लाटा "त्सुनामी" आल्यासारख्या अंगावर आल्या! नाकातोंडात पाणी गेले एवढी भारी उडी होती त्याची!

                   पोहायला न येणारी २-३ लोकंही होते आमच्यात पण तारूण्याच रक्त ते! उतरले विहिरित पण पायर्‍यांवरून. मग त्यांना पोहायला शिकवणे, पाण्यात स्वतःच्या "सो कॉल्ड" स्किल्स दाखवणे, एकमेकांना बुडवणे असले सगळे प्रकार करत करत कधी ३ वाजून गेले कळालेच नाही!हळू हळू एकेकाचा स्टॅमिना संपू लागला. साधारण ३:३० पर्यंत सगळे विहिरितून बाहेर पडले.

                    मग आता कार्यक्रम होता "कपडे वाळवणे" ! मस्त उन पडलेलं त्यात वाहणारा मंद वारा, वाजणार्‍या थंडीने हळूच दात एकमेकांवर आपटायला लावत होता. पण त्यातही मजा होती. शेजारच्या शेतातले मस्त मोठे टुणटुणीत ऊस खात, एकमेकांच्या "सुद्रुढ" शरिरयष्टीची चेष्टा करत करत अर्धा एक तास गेला! पुन्हा व्यवस्थित कपडे घालून तयार होऊन परतिच्या प्रवासाला निघालो. तेवढ्यात का कोणास ठाऊक एकदम "ऊसाचा रस" प्यायची हुक्की आली! लगेच गाड्या रसवंती गृहाकडे वळवल्या! "गृह" कुठले, कापड लावून बनवलेली कुटी. चांगला १२-१५ लिटर रस पिला असेल! ३-३ ग्लास प्रत्येकी! :D

                 त्या रस काढणार्‍या मशिनला लावलेले ते घुंगरू, त्यांचा तो नाद, कडक उनात बर्फ घालून ठसका येईल इतका गोड रस, वाह! कसला सॉलिड दिवस संपत होता! वाटत होते हा दिवस कधी संपूच नये! मनात थोडी भितीपण वाटत होती, कारण एकदा "इंजिनिअर" असा शिक्का लागून बाहेरच्या विश्वात स्वतःचे "स्वत्व" शोधण्यास बाहेर पडल्यानंतर असे मित्रांसोबत हूंदडणे जमेल?पहिली गोष्ट असे मित्र पुन्हा मिळतिल? हा असा दिवस परत आपल्या नशिबी कधी येईल? नकळत डोळे पाणावले. मला तंद्रितून जागं करत राहुल्या म्हणाला, "ए अद्व्या आवर लवकर! पुढच लेक्चर गाठायच आहे ! नाहितर सगळा रस जिरेल HOD पकडला तर!". राहुल्याच्या HOD ला उद्देशुन "अरे-तुरे"च्या बोलण्याने हसु आले. हसत हसत पण मनात कोठेतरी आज मित्रांसोबत घालवलेला एक उनाड दिवस आठवत गाड्या पुन्हा कॉलेजकडे वळाल्या!

यारो हम रहे या ना रहे कल ,  याद आयेंगे ये पल! 

-अद्वैत
मराठी ब्लॉग्स

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...