Friday, March 20, 2015

मी आणि तु ....(भाग २)



आजपासून साधारण ८ वर्षांपूर्वी............


"विक्या !!!! अरे ए विक्या!! उठलास का ??"
"अगं झोपू दे ना ग आई. काय रोज रोज लवकर उठवतेस!"
"अरे रोहीत आलाय. टेंशनमधे दिसतोय. पाठवू का वर त्याला?"
"हो हो. पाठव!"

रोहीत धावत माझ्या खोलीमधे आला.

"अरे विक्या!! चल आवर लवकर!!"
"का रे? काय झालं? सगळ ठिक ना?"

"कसलं आलय ठिक? आपले मजनू पुन्हा जीव द्यायला निघालेत. चल लवकर. मला काय आवरेना तो. तुच चल लवकर"
"आयला! काय रे याच रोज रोजच नाटक? उडी मारायच्या विचारानं ओली होते याची आणि हा म्हणे जीव देणार!"
"अरे विक्या चेष्टा नको रे करू. Please चल लवकर."
"अरे चेष्टा नायतर काय करू! दिसली पोरगी की पडला प्रेमात! अरे शेजारचा तो दिड वर्षाचा बबलू चालायला शिकताना जेवढा पडला नसेल तेवढा हा गृहस्थ प्रेमात पडला असेल!"
"विक्या जोक मारू नको. तु येणारेस की मी जाऊ?"
"आयला! तुम्ही दोघंपण ना एकदम ऍंटिक पीस आहात. चल हो पुढ, मी येतो तोंड धुवुन."
------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------


"विक्या अरे किती वेळ लावलास?"
"हम्म्म! बर कुठयेत साहेब?"
"कुठ असणार? तो बघ तिकडं. कड्यावर बसलाय"
"हम्म्म! ठिक आहे! यावेळी मीच ढकलतो त्याला! म्हणजे रोज रोज माझी झोप मोड नको"
"अरे ए विक्या! अरे येडा झालायेस काय?’
"मग काय तर! वैताग आलाय मला याचा"

मी तसा एकदम बारीक शरिरयष्टीचा होतो. त्यामुळे त्या कड्यावर चढायला जास्त वेळ नाही लागला. पण प्रश्न हा होता की हा जाडा आज्या कसा काय तिथं पोहचला असेल. मी त्याच्या जागी असतो तर एकतर जीव द्यायची जागा बदलली असती नाहीतर सरळ प्लॅनच कॅंसल केला असता. असो. मी धापा टाकत शेवटी कड्यावर पोहचलो. रूमाल काढला, बसायची जागा झाडली आणि आज्याच्या शेजारी बसलो. नेहमी प्रमाणे महाराज शुन्यात नजर लावून बसले होते.

"काय मस्त हवा आहे नाही आज्या?"
"हम्म्म्म !"
"अरे ते बघ ते तुझ घर! केवढस दिसतय नाही इथुन?"
"हम्म्म्म!"
"अरे ते बघ......"
"विक्या! नळकांड्या! उगाच नेहमी सारखं फालतू बडबडू नको. आधीच मुड नाय माझा!"

माझ्या "सुद्रुढ" शरिरयष्टीमुळे "नळकांड्या" हे माझं नामकरण आज्यानेच केलं होतं.

"बर बाबा! sorry! बोल काय मॅटर यावेळी?"
"काय नाय सोड ना!"
"बर ठिक आहे. बर मला सांग तु उडी मारतोयेस की मी ढकलू? एकदाच काय ते करून टाक."
"अरे ए भुसनाळ्या! इथ तुज्या जिगरी दोस्ताच्या लाईफ़चा सवाल हाय आनि तु हे बोलतोयेस? हिच काय तुझी यारी?"
"आता मग काय करू सांग? विचारलं तर भाव खातोयेस!"
"मग प्रेमानं विचारायच! आगोदरच प्रेमभंग झालाय आनि तु त्यात......"
"कितीवेळा प्रेमभंग होतो रे तुझा? बर यावेळी कोण होती ती कमनशिबी जिनं आमच्या वाघाला नाकारलं?"

एक हलकं स्मितहास्य अज्याच्या चेहर्‍यावर मला दिसलं. बहुतेक "वाघा"ची उपमा एकदम योग्य जागेवर बसली! Bull's eye का कायतर म्हणतात ना, तसं!!

"अरे ती मानेंची रेश्मा आहे ना..."
"ती? ती आवडली तुला ? ती बरोबर मुलगी नाही. तुझ्यासाठीतर मुळीच नाही"  आज्या बोलायच्या आतच माझ्या तोंडून नकळत बाहेर पडलं.
"ए नळकांड्या! माझी लाईन आहे ती! काय बोललास तर बघ तिला!"
"अरे माझ्या राजा! ती आगोदरच एंगेज आहे! पानपट्टीवाला बबन आहे तिचा छावा"
"म्हणजे? तुला पण माहित होत? कधी बोल्ला नाईस मला? आणि तिनं त्या बबन्यासाठी मला नाकारलं? मला?"
"आता मला काय माहित यावेळी तुझा नेम तिकड लागणार आहे? आणि ’तुला पण’ म्हणजे? आणखी कोणाला माहित आहे?"
"अरे तस नाय! ती पण हेच म्हणाली की मी एंगेज आहे. माझा नाद सोड!"
"चायला आज्या तुझं डेअरिंग दिवसेंदिवस वाढत चाल्लय की? तिला विचारून मोकळा पण झालास?"
"अरे मंग काय? रेशनच्या लाइनमधे समोरच उभी होती. दुकान उघडायला वेळ होता म्हणून विचारून टाकलं?"
"वाह! बर हे तुझ प्रेमप्रकरण कधीपासून सुरू होतं?"
"सकाळी ७ ला मी लाईनमधे तिच्यामागं उभारलो. साडे ७ वाजले असतिल, ती मला आवडली. ८ वाजता प्रेमात पडलो. साडे आठला प्रपोज केलं आणि ९ वाजता ब्रेकप झालं"
"आता मी एक काम करतो. मीच उडी मारतो इथुन. घरी माझ्या आईला सांग मला या जीवनाचा साक्षातकार झाला आणि मी स्वेच्छेने देहदान केलं"
"ए विक्या! कानपाड फोडेन असलं काय बोल्लास तर! अपला जिगरी आहेस तु! अरे अशा ५६ मुली येतिल परत लाईफमधे पन तुझ्यासारखा जिगरी नाय मिळनार मला!"

आज्याच्या डोळ्यातलं आलेलं टुचुकभर पाणी सगळं काही सांगून गेलं. आज्याच्याच भाषेत बोलायच झालं तर "जिगरी" या शब्दाचा खरा अर्थच जणू मला  समजला.

"बर बाबा! चुकलं माझं. पण काय हा तुझा फालतुपणा? कोणपण दिसली की कसाकाय प्रेमात पडतोस? आणि नाही यश आलं की चाल्लास जीव द्यायला."
"काय करू सांग! frustration आलय. कोणच होकार देत नाय!"

"अरे जरा धिरानं करायच्या असतात या गोष्टी. घाई गडबड करून काही मिळणार नाही."

"ऐका कोन सांगालय!"

"तुला काय समजायचय ते समज! पण एक promise कर की परत हे ’प्रेमात पडायच, मग प्रेमभंग की लगेच जीव देण्याची धमकी’ बंद करायच!"

"प्रेमात नपडायच promise काय करनार नाही पन ते जीव वगैरे काय देनार नाही. आईची शप्पत. सुटल्या म्हन"
"सुटल्या"

आज्या आणि मी तिथुन उठलो. हळू हळू कडा उतरला. खाली रोह्या हाताची बोटं मोडत चिंतेत उभा होता. आम्हाला दोघांना ’जिवंत” खाली येताना बघून त्यानं उसासा टाकला आणि पळत येऊन आम्हाला मिठी मारली. आज्याच्या पोटात दोन बुक्क्या घातल्या आणि आम्ही तिघे परत घरी निघालो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

हे असं आमचं त्रिकुट. उभ्या पंचक्रोषीत परिचित होतं. वेळप्रसंगी एकमेकांसाठी जीव द्यायची आमची तयारी होती. अगदी प्राथमिक शाळेपासून आम्ही एकत्र होतो. रोह्या अभ्यासात खुप हुषार होता. चांगले मार्क्स मिळाले असतानाही त्याने त्याच्या वडलांचे नऐकता मला आणि आज्याला ज्या कॉलेजमधे admission मिळाली तेथेच admission घेतली. तिघही लवकरच आपापली घरटी सोडून दुरच्या ठिकाणी जाणार होतो. Engineering हे आम्हा तिघांनाही घ्यायचं होतं आणि नशिबाने आता आम्ही तिघही एकाच college मधे, एकाच वर्गात शिकणार होतो. तिघांच्याही मनात खुप स्वप्न होती आणि एकमेकांची साथ असताना बाहेरच्या जगाची तर चिंताच नव्हती..... !

================================================================================


मी आणि  तु  ....(भाग १) ला मिळालेला प्रतिसाद खरच अनपेक्षित होता. आता या मी आणि  तु  ....(भाग २) पासून कथेला गुंफण्याचा अवघड प्रयत्न सुरू होत आहे. हा भागही आपल्याला आवडेल अशी आपेक्षा करतो. हा दुसरा भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा. :)


-अद्वैत कुलकर्णी

Monday, March 16, 2015

मी आणि तु ....(भाग १)

“Good Morning Pune! सकाळचे ८ वाजले आहेत आणि मी विकी आपल्या सर्वांच आपल्या लाडक्या Talk With Vikcy कार्यक्रमात स्वागत करतो. वाह! आज काय मस्त वातावरण आहे नाही? मस्त रिमझिम पाऊस सुरू आहे आणि मी मस्त गरमा गरम चहा पित तुमच्यासाठी घेऊन आलोय मस्त गाण्यांचा नजराणा....! आपल्याला जर माझ्याशी मस्त गप्पा मारायच्या असतिल , एखादे  गाणे ऐकायचे असेल किंवा तुमच्या some one special ला डेडिकेट करायचे असेल तर लगेच फोने उचला आणि डायल करा ९८४५६५५०५०. चलातर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात माझ्या आवडत्या गाण्याने, “चिंब भिजलेले...From movie बंध प्रेमाचे”.

गाणं सुरू झालं तसा मी off Air गेलो. आज खरच खुपच सुंदर वातावरण होतं . बाहेर मस्त रिमझीम पाऊस सुरू होता  पण रेडिओ स्टुडिओच्या या बंद रूममधे तेही AC मधे बसून तो feel आणणं जरा कठिणच जातं होतं . चहा नेहमी प्रमाणे माझ्या आवडीचा म्हणजेच फक्त दुधाचा बनवला होता . एकदम फक्कड!

“विकी SSS!!! कॉल यायला सुरू झाले आहेत. कुठयं लक्ष?” ,राजू सरांच्या आवाजाने मी भानावर आलो. त्यांना एक स्माईल दिली अणि पुन्हा On Air गेलो.

“मग मंडळी! कशी झाली दिवसाची सुरूवात. I hope या गाण्याने तुम्हाला नक्कीच फ्रेश केलं असेल. काय म्हणताय? अजून गाणी ऐकायची आहेत? मग वाट कसली बघताय लगेच फोन उचला आणि डायल करा ९८४५६५५०५०. चला तर बघू आज आपला पहिला caller कोण आहे!

“Hello, मी विकी, तुमच Talk With Vicky कार्यक्रमात स्वागत आहे. आपलं नाव कळू शकेल का?”

“Hi विकी. मी पुनम”

“Hi पुनम. कशी आहेस?”

“मी मस्त. तु कसा आहेस?”

“मी पण एकदम बेस्ट! बर मला सांग तु काय करतेस?”

“मी सध्या इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षात आहे. CoEP ला कंप्युटर सायन्सला”

“अरे बापरे! तो आज सुभह सुभह इंजिनिअरसे पाला पडा हे! बचके रेहना पडेगा रे बाबा...! हा हा हा! मग बोल कोणत गाण ऐकायच आहे तुला?”

“Actually मला हे गाण डेडिकेट करायच आहे. Some one special ला.”

“oh! Awesome. याला म्हणतात दिवसाची perfect सुरूवात. बोल कोणतं गाणं ऐकवू?”

“मला “यंदा कर्तव्य आहे” मधिल “आभास हा” ऐकवायच आहे”

“ओह ग्रेट पुनम. मस्त चॉईस. I hope तुझा some one special हा कार्यक्रम ऐकत असेल. Thank you for your call. Now playing “आभास हा !!” from movie यंदा कर्तव्य आहे.”

गाणं पुन्हा सुरू झालं. तसा मी offline झालो. आज पहिलाच caller आपल्या someone special साठी फर्माईश घेऊन आलेला बघुन खुप छान वाटलं. चहाचा घोट घेत घेत या कपलचं एक काल्पनिक चित्र रेखाटत बसलो. चहा झाला म्हणून कप टेबलावर ठेवायला गेलो आणि नकळत अंदाज चुकला आणि कप खाली पडला. माझ्या व्हिलचेअर वरून मला खाली पडलेले तुकडे गोळा करता येत नव्हते. माझी वायफळ धडपढ बघून राजू सरांनी काचेपलिकडूनच “Let it be. Programकडे लक्ष दे ” असा इशारा केला. तसा मी माझी व्हिलचेअर पुन्हा निट सेट करून गाण संपायची वाट बघत बसलो.

आज खुपच call येत होते. ते बघून एक सुखद हास्य नकळत गालावर खुललेलं. आपला show बराच लोकप्रिय आहे हिच जणू त्याची एक पावती असते. तेवढ्यात गाणं संपलं. आता पुन्हा माझी on air जायची वेळ झालेली.

“काय मग पुणेकर! कशी वाटली पुनमची फर्माईश. तिच्या Someone special. अरे बाबा हा कर्यक्रम ऐकत असशील तर बघ पटकन पुनमला call कर! अशी special सगळ्यांच्याच नशिबी नसते रे बाबा! हा हा! चला आता next caller कडे वळू. त्या आधी एक reminder; आपल्याला जर माझ्याशी मस्त गप्पा मारायच्या असतिल , कोणते गाणे ऐकायचे असेल, पुनम सारखं तुम्हालाही तुमच्या someone special ला डेडिकेट करायचे असेल तर लगेच फोने उचला आणि डायल करा ९८४५६५५०५०. बर बघु आपला next caller कोण आहे ते.

“Hello. मी विकी, तुमचं Talk With Vicky कार्यक्रमात स्वागत आहे. बोला काय म्हणताय?”

“Hi Vicky. Thank God you finally picked my call”

“oh! माझं नशिब खुप छान आहे मग आज”

“Naah! Actually I was trying to reach you since last many years”

“हाहाहा! काहीही काय राव! हा कार्यक्रम सुरू होऊन तर अजून वर्षही झालं नाही.”

“Nope dear. I know you personally”

“काय राव सकाळ सकाळी थट्टा! मी काही एवढाही famous नाही की माझे fan followers असतिल”

“नाही. I am serious. I know you better than anyone in this world”

“oh! आईला तर English येत नाही माझ्या. आणि तिचा आवाज एवढा यंगही नाही. त्यामुळे तु माझी आई तरी नक्कीच नाहीस. आणि तिच्याशिवाय मला कोणी ओळखत असेल असं मला नाही वाटत. तरीही चला बघूच. चल, माझा आवडता रंग सांग”

“लाल.”

“Oh! Correct! Wild guess han!!!, चल आता सांग आवडतं फुल”

“सोनचाफा”

“Unbelievable! पुन्हा बरोबर. बरं आवडत ठिकाण?”

“मनाली”

“आवडता लेखक?”

“पु.ल. देशपांडे”

“आवडता अभिनेता?”

“आमिर खान”

मी प्रश्न विचारत होतो अन ती  एका पाठोपाठ एक अचुक उत्तरं देत होती. प्रत्येक अचुक उत्तरासोबत माझी बैचेनी वाढतचं होती. माझ्या अपघातानंतर गेले ४ वर्ष मी आणि माझी आई पुण्यात राहायला आलो होतो. ना कोणी जवळचा मित्र ना मैत्रिण. तरिही ही माझ्याबद्दल एवढ कसं जाणत होती? शेवटी मला राहावल नाही.

“बाई मी हारलो! कोण आहेस तु?”

“मी बोल्ले होते की I know you better than anyone. पण तु अजूनही सुधारला नाहीस! तसाच आहेस!”

“पण तु आहेस तरी कोण?” आता तर मी पुर्णतः बैचेन झालो होतो. तेवढ्यात तिकडून आवाज आला

“मुग्धा. मुग्धा परांजपे.”

एक जबरदस्त धक्का! स्टुडिओ मध्ये स्मशान शांतता! विकी पुर्ण  shock मधे.................!

==========================================================================

आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा ब्लॉग लिहितोय. डोक्यात बऱ्याच दिवसांपासून एखादी दीर्घकथा लिहायची इच्छा होती ती इच्छा  या  "मी अणि तु"  दीर्घकथेद्वारे पुर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. हा पहिला भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा.

-अद्वैत कुलकर्णी

Friday, April 18, 2014

सावर रे मना


ना सांज ना पहाट,
मनी विचार तुझे मोकाट
किती घालू मना मी आवर,
हे हृदया तुच मज सावर.

सांग तुझ्या यातना त्या वेड्या मना,
ज्या त्याने ना कधी भोगिलेल्या
नको देऊस पुन्हा त्यास रमू,
आठवणिंत तिच्या उरलेल्या.

असतिल जरी शब्द तिचे मधूर,
आता नको मनी नव अंकूर
लागे जरी तो चेहरा हवासा,
नाही उरला तेथे तुला दिलासा.

विसर रे मना,विसर तिला आता
नाही जागा तुला तिच्या हृदयी आता
नाही उरली आता कसलिच आशा
ना कळली कधीच तिला तुझ्या प्रेमाची भाषा.

-अद्वैत कुलकर्णी

Monday, January 20, 2014

चार शब्द...!

आज जवळजवळ १ वर्ष झालं मला माझ्या ब्लॉगपासून दूर राहून. आजपासून पुन्हा ब्लॉगिंगला वेळ द्यायचे ठरवले आहे. त्यानिमित्ताने हे चार शब्द....!

तसं बघितलं तर बरच काही बदलल या वर्षभरात. काही आपले दुरावले तरी काही नवे जवळ आले. जे आपल्या अगदी जवळ हवे हवे असणारे, नजाणे का पण नजरेआड झाले. प्रत्येकाला आपली "स्पेस" हवी असतेच म्हणा. आसो! आशा आहे जे जवळ आहेत ते जवळच राहोत.

या वर्षाच्या सुरूवातीस मनात "संकल्पा"ची कल्पना आलेली पण दरवर्षी "न-होणारे" संकल्प करण्यापेक्षा ते न केलेलेच बरे अशी समजूत काढून त्यांपासून दुरच राहयचे ठरवले आहे (संकल्पच म्हणा ह्याला हवं तर). गेलं वर्ष तसं बघितलं तर फार काही चांगलं गेलं नाही पण का कोणास ठाऊक फारच लवकर गेल्यासारखं वाटतय. अजून २०१४ लिहायला हात वळतच नाहीये. होईल सवय हळू हळू. येणार्‍या वर्षात बरच काही अनुभवायला मिळणार याची खात्री आहे आणि मीही त्यासाठी तयार आहे.

असो..! भाषणातले नसंपणारे चार शब्द न बनवता ही पोस्ट इथेच उरकती घेतो. लवकरच भेटू नव्या पोस्टस सोबत! उशीरा का होईना पण तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :)

Friday, April 19, 2013

( मराठी चित्रपट ) प्रेमाची गोष्ट : मला नाही भावला!

आज जवळ जवळ १० महिन्यांनंतर ब्लॉग लिहितोय. बरच काही घडलं या कालावधित. त्यातिल काही किस्से नक्कीच शेअर करेन. पण आज ब्लॉग लिहायला घेतलाय तो नुकताच बघितलेल्या मराठी चित्रपटावर. सध्या मराठी चित्रपटांना सुगिचे दिवस आलेले दिसताहेत. "हिरवं कुंकु(?), माहेरचा शालू" वगैरे टिपिकल चित्रपटांना बाजूला सारून नविन धाटणिचे चित्रपट प्रदर्शित होताना पाहून नक्कीच चांगलं वाटतयं. काहींनी तर राष्ट्रिय पातळीवरिल पुरस्कार देखिल पटकवले आहेत. जिथे क्वचितच एखादा मराठी चित्रपट दिसायचा असा वर्तमानपत्राचा चित्रपट विभाग आजकाल मराठी चित्रपटांनी गच्च भरलेला दिसतो. खरच या गोष्टी सुखावणार्‍या आहेत.

मध्यंतरी फ़ेसबुकवर अतुल कुलकर्णी असल्याचे समजले. तसा मला आवडणार्‍या अभिनेत्यांपैकी एक. लागलीच त्यांना सब्स्क्राईब झालो. काही दिवसातच त्यांच्या अकाऊंटवर सतत " प्रेमाची गोष्ट" या शब्दाचा वापर वाढलेला दिसू लागला. पहिल्यांदा मला ते एखादं नाटक असावं किंवा टिपिकल मराठी सिरियल असेल असे वाटले पण जेव्हा अतुलजींनी हा फोटो अपलोड केला तेव्हा कल्पना आली की हा मराठी चित्रपट दिसतोय. त्यानंतर त्यांच्या अकाऊंटवर केवळ याच चित्रपटाची पब्लिसिटी होती. लवकरच प्रदर्शितही झाला. पहिल्यांदा जेव्हा हा पोस्टर पाहिला तेव्हा ती नायिका कोणीतरी नविन वाटली पण जेव्हा समजलं की ती घाटगे कन्या आहे तेव्हा पहिले तर विश्वासच बसला नाही. कारण "चक दे" मधला तिचा चेहरा आणि या चेहर्‍यात खुप फरक वाटला.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर विचारायलाच नको इतक्या लोकांच्या कमेंट्स अतुलजींच्या अकाऊंटवर बरसू लागल्या. इतक्या छान छान कमेंट्स वाचून लवकरच चित्रपट सहपरिवार पाहायच निश्चित केलं. त्यात राजवाडेंचे दिग्दर्शन म्हणजे "सोनेपे सुहागा"च असणार असा एक विश्वास वाटू लागला. एवढ कौतुक ऐकल्यानंतर आपोआपच माझ्या आपेक्षा खुपच वाढल्या. "मुंबई-पुणे-मुंबई" ने माझं मन जिंकलेलं त्यामुळे राजवाडेंचा हा चित्रपटही तसाच हिट असणार अशी एक आशा वाटू लागली. नेहमीप्रमाणे "घरगुती" कारणांमुळे चित्रपट पहायला सवड मिळालीच नाही. शेवटी "TV वर येइल तेव्हा पाहू" अशी स्वतःची समजुत काढून घेतली आणि खरच खुपच लवकर हा चित्रपट TV वर दाखवला गेला. गेल्याच आठवड्यात स्टार प्रवाहवर दाखवला गेला. (तो स्टार प्रवाहवर दाखवला जाणारे हे देखिल मला अतुलजींच्या अकाऊंटवरूनच कळालं :D ). मॉंसाहेबांच्या  डेली सोपच्या टाईट शेड्युलमधून कसा बसा वेळ काढला आणि सहपरिवार चित्रपट पाहायला बसलो.

आधीच आपेक्षा एवढ्या उंचावल्यामुळे सुरुवातीपासूनच नाविन्य शोधत होतो. कदाचित नविन कहितरी बघायला मिळणार हिच मानसिकता तयार झालेली. राजवाडेंच्या बाबतीतली एक गोष्ट मला खुप आवडली ती म्हणजे "सिंप्लीसिटी". कोणताही भव्यदिव्य सेट नाही, विनाकारण न पेलणारे खर्च नाहीत. फक्त पुर्ण फोकस चित्रपटातील पात्रांवर! सुरूवात बरी वाटत असतानाच घाटगे बाईंची एंट्री झाली. पोस्टर नक्कीच फोटोशॉप एडिट केले असणार याची क्षणात खात्री पटली कारण मुळात मला या बाईंचा चेहरा कधी "नायिका" म्हणून आवडला नाही. आसतिल या दिसायला सुंदर पण मला कधीच सुंदर वाटल्या नाहीत. तेवढ्यात या बाईंचा पहिला डायलॉग कानावर पडला. अरररर..........! चेहरा ठिक आहे पण कसला आवाज आणि कसलं मराठी. पुर्ण निराशा झाली. या बाईंना साधं नीट मराठीही बोलता येत नाही आणि आवाजात काही चढ-उतारही नाही. एखाद्या नाटकात काम करत असल्यासारखा यांचा अभिनय. एकिकडे अतुलजी. एक परफ़ेक्ट अभिनेता. सुरुवातीपासूनच ते त्यांच्या "कॅरेक्टर"मधे इन्हाल्व्ह झालेले दिसले. आवाजात योग्य चढ-उतार, अचुक क्रिया-प्रतिक्रिया या त्यांच्या अभिनयाने समाधान वाटले.

अनपेक्षितपणे राजवाडेंची एंट्री देखिल छान वाटली. असंभव मधिल त्यांचा अभिनय पाहिला होता त्यामुळे चांगल्या अभिनयाची आपेक्षा होती  आणि सपोर्टिंग रोल असुनही त्यांनी ती योग्य पद्धतीने पुर्ण केली. चित्रपट जसजसा पुढ जात होता तस तशा मला घाटगे बाई जास्तच खुपु लागल्या. सारखे मनात विचार यायला लागले की याच मिळालेल्या काय राजवाडेंना? त्यांच्या जागी कितीतरी चांगल्या नायिका मराठी फिल्म इंडस्ट्रिमधे आहेत. कदाचित मुक्ता बर्वे देखिल चालल्या असत्या किंवा गिरिजा ओक देखिल नक्कीच घाटगे बाईंपेक्षा त्यांच्या रोलला जास्त न्याय मिळवून देऊ शकल्या असत्या. असो. तसच सहन करत मी चित्रपट पाहात होतो. एकदोन गाणी कानाला श्रवणिय वाटली पण मेंदूपर्यंत गेली नाहीत. "कधी तु, का कळेना" इत्यादी गाणी थेट मेंदूपर्यंत गेली तशी ही गाणी खास वाटली नाहीत.

चित्रपटात अतुल कुलकर्णी हे कथालेखक दाखविले आहेत. त्यात त्यांचा एक डायलॉग काहीसा या आशयाचा आहे की "चित्रपट असा असावा की प्रेक्षक त्यात गुंतुन जाईल. पुढे काय होणार याची उत्सुकता राहिल" पण हिच मला या चित्रपटात असलेली कमतरता वाटली. मुळात ते लिहित असलेली कथाच या चित्रपटाची कथा असल्याने लागलीच पुढे काय होणार याचा सहज अंदाज बांधता येत होता. तरी कथेला "ट्विस्ट" द्यायचे प्रयत्न चांगले वाटले. संपुर्ण चित्रपटात झालेले कॅमेरावर्क, एडिटींग, दिग्दर्शन नक्कीच आवडले. चित्रपटाची "पिक्चर कॉलिटी" देखिल उत्कृष्ट आहे. चित्रपटातील इतर सहाय्यक कलाकारांचे अभिनयही उत्कृष्ट वाटले आणि त्यांच्या त्या सुंदर अभिनयामुळे घाटगे बाईंचा अभिनय मला जास्तच साधारण वाटू लागला.

ओव्हर ऑल पाहता चित्रपट ठिक वाटला. जेवढं कौतुक मी चित्रपट पाहायच्या आधी ऐकलेलं, वाचलेलं त्यामानाने तर अजिबातच हा चित्रपट मला भावला नाही. मला कल्पना आहे की अगदी क्वचितच लोक माझ्या मताशी सहमत असतिल  पण राजवाडेंच्याकडून मला कदाचित जरा जास्तच आपेक्षा असतात.

असो! मी या चित्रपटाला रेटिंग देईन: ३/५

Saturday, July 7, 2012

मास्टरपिस: I Too Had a Love Story


लेखक: रविंदर सिंग
भाषा: इंग्रजी (मराठी अनुवादाबद्दल माहिती नाही.)
प्रकाशन: Srishti Publishers & Distributors


मध्यंतरी परिक्षेच्या नादात वाचन पुर्णपणे बंद होतं. महिना-दोन महिने वाचन नसल्यामुळे आपोआपच काहितरी वाचावस वाटू लागलं. घरची आई-आजोबांनी वाचुन संग्रहित केलेल्या पुस्तकांची अतुल्य लायब्ररी जरी असली तरी जास्तीत जास्त पुस्तकं ही एकतर अध्यात्म ज्याचा माझ्याशी दुर-दुर चा संबंध नाही :D आणि ती सोडली तर राहिलेली थोडी फार जुनी-नवी पुस्तकं. पण वयाचा परिणाम म्हणा किंवा अचानक आलेली हुक्की पण "Love Story" वाचाविशी वाटू लागली. मित्रांकडेही काही पुस्तकं होती पण ती काय रुचली नाहीत. मग सहज फ्लिपकार्टवर सर्च केलं आणि "I Too Had a Love Story" हे National Best Selling Book च्या यादित दिसलं. पुस्तक खरेदी करणार्‍यांचे रिव्ह्यु वाचले तर सर्वांनी ४/५ स्टार दिलेले. मग कोणताही विचार न करता घेतलं विकत.

२ दिवसांत पुस्तक माझ्या हातात होतं. लगेच घेतलं वाचायला. प्रस्तावना वगैरे गाळून डायरेक्ट कथेलाच हात घातला. ४ इंजिनिअरिंगचे मित्र, बर्‍याच दिवसांनी एकत्र येतात. जवळ-जवळ ४ वर्षांनी. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात सेटल झालेला असतो. मग इकड-तिकडच्या गप्पा. वगैरे- वगैरे. सुरवात वाचल्यावर वाटू लागलं "च्यायला, अजुन एक " 5 point Someone" दिसतयं." थोडासा निराष झालो. पण आता घेतलयं एवढ्या हौसेने तर वाचलं तरी पाहिजेच! मग परत घेतलं वाचायला आणि तोच माझा सगळ्यात योग्य निर्णय ठरला असं म्हणायला हरकत नाही. I Too Had a Love Story या पुस्तकाला मी "एक मास्टरपिस" असं म्हणेन.

कथेचा नायक रविन म्हणजेच स्वतः लेखक रविंदर सिंग. एक पंजाबी इंजिनिअर. वेल एज्युकेटेड, वेल सेटल्ड पण अजुनही बॅचलर. मित्रांच्यात पैज लागते की कोण पहिले लग्न करणार! साधारण नायक हा लग्नाच्या विचारातही नसलेला पण मित्रांना त्याच्यावरच खात्री असते की "आमच्यात पहिले लग्न तुझेच होणार!". मग मित्रांच्यात इंटरनेट विश्वात घडणार्‍या नव्या क्रांती विषयी चर्चा होते आणि विषय निघतो "मॅट्रीमोनिअल साईट" म्हणजेच "विवाहसंस्था संकेतस्थळ" www.Shadi.com बद्दल. चौघांपैकी फक्त एकच मित्र या नव्या पद्धतिच्या बाजूने असतो तर नायकासह उरलेले तिघे त्याच्या विरोधात. पण तो मित्र या तिघांना पटवून देतो की आपण आपल्यासाठी कशी साथिदार हवी आहे हे दिलेल्या categories मधून अगदी एका click सरशी बघू शकतो वगैरे वगैरे. पण तरिही हे लोक काही त्याच बोलण ऐकून घेत नाहीत.

नंतर थोड्या दिवसांनी नायक सहज मजा म्हणून त्या संकेतस्थळावर स्वतःची प्रोफाईल बनवतो. नंबर वगैरे देतो, त्याला कशी मुलगी पाहिजे वगैरे माहिती भरतो. सगळ व्यवस्थित झाल्यावर ते संकेतस्थळ त्याला क्षणात त्याच्या अपेक्षा पुर्ण करणार्‍या मुलिंची यादी दाखवते. हा प्रकार पाहून तोही हदरतो की इतक्या झटक्यात माझी "ड्रिमगर्ल" तेही इतक्या "ऑपशन्समधे" ? मग त्यातल्या बर्‍याच जणिंशी संपर्क साधतो. काही उत्तर देतात. काहिना तो आवडतो तर त्याला त्यातली कोणिच नाही आणि एके दिवशी त्याची "परफेक्ट मॅच" त्याला भेटतेच.

त्या दोघांच्यात पहिले मैत्री आणि नंतर हळूहळू प्रेम होते. एकमेकांना प्रत्यक्षात कधिही न पाहता देखिल ते एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू लागतात. थकवणारे दोघांचे शेड्युल असले तरी रात्र-रात्र फोनवर गप्पा मारण्यात घालवू लागतात. त्यांचा रोमांस वा़चताना खरोखरच मजा येते. माझ्या नशिबी अजुनतरी असलं काही नाही आलं (लवकर येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना ;) )पण तरिही वाचताना खुप मजा आली. एक विशेष म्हणजे कोठेही "वासना" दिसली नाही आणि हिच या लेखकाबद्दलची आवडलेली गोष्ट. अगदी सरळ साधं निर्मळ प्रेम. आणि तेही इतकं की एकमेकांना न बघताही एकमेकांना साताजन्माचे जिवनसाथी मानू लागलेले.

पुस्तक खुप सुंदर सुरू होतं. ते दोघे एकमेकांसाठीच जणू बनले असतिल, कोणाची द्रुष्टच लागावी असं त्यांच प्रेम. पण काय कोणास ठाऊक त्यादिवशी मला कोणती विपरित बुद्धी झाली. अचानक बसल्या बसल्या प्रस्तावना वाचली. आणि त्यात लिहिलेलं "प्रत्येक प्रेमकहाणी ही पुर्ण होतेच असं नाही!" ..... बस्स......! माझ्या काळजाचा ठेका चुकला. हा काय प्रकार आहे? नेमकं काय झालं असेल त्यांच्या प्रेमाला? कोणाची नजर लागली असेल? नायिका नायकाशी "टाईमपास" तर करत नसेल? किंवा तिची ती प्रोफ़ाईल ज्यावर नायकाने विश्वास ठेवला ती खोटी तरी नसेल? की आणखी काही.....? सतराशेसाठ शंका मनात आल्या. एकेक पान वाचताना ह्रदयाचे ठोके जोरात धडधडू लागले. परिक्षा जवळ आल्यावर जशी भिती वाटते तशी काहिशी भिती वाटू लागली. आणि खरच सांगतो अशी प्रेमकथा कोण्या दुष्मनावरही येऊ नये. ;(

एखादी व्यक्ती जेव्हा दुसर्‍यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते, स्वतःचं आयुष्य जीच्यावर ओवाळून टाकते तिच व्यत्की जेव्हा मिळत नाही तेव्हा होणारे ते दुःख खरच अंगावर काटा आणते. माझ्यासारखा कठोर मनाचा (माझ्या आईच्या भाषेत "दगड" :)) ) असलेलाही वाचताना कित्येकवेळा डोळ्यात अश्रू काढतो यावरच या लेखकाची ही लेखणी किती प्रभावशाली असेल याचा अंदाज येतो. पुस्तकाचा शेवट नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी आणेल.

मला पुस्तक इतकं आवडलं की मी नेटवर आणखी माहिती काढायचा प्रयत्न केला. तेव्हा समजलं की ही त्या लेखकाची "सत्यकथा" आहे. मी त्या नायिकेचाही शोध घेतला. मजा म्हणजे त्या नायिकेचा फेसबुकवर "फॅनपेज" आहे आणि मी ही त्याला "Like" केलय! तेवढ्यात मला या कथेचा पुढचा भाग फ्लिपकार्टवर दिसला. आता तोही मागवला आहे. लवकरच वाचून त्याचाही रिव्ह्यु ब्लॉगवर प्रसिद्ध करतो.


का वाचावे
एक निर्मळ प्रेमकथा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे "सत्यकथा". माझ्या वयाच्याच काय पण अगदी प्रौढांनाही वाचताना मजा येईल. कदाचित त्यांच्या पर्सनल Love Stories ज्या पुर्ण झाल्या - नझाल्या त्या ताज्या होतिल. ;) खरच म्हणतात ना "Life never stops" . वाचताना आपणच नायक आहोत असा काहिवेळा मला भास झाला इतकं प्रभावी लेखन! माझ्यामते हे एक "Must Read" पुस्तक आहे.

का वाचू नये

तसे काहीच कारण नाही. आणि द्यायचेच झाले तर तुम्ही "ब्रम्हचारी" असाल तरच वाचू नका असे म्हणावे लागेल! :D :))
ओव्हरऑल खरच एक छान पुस्तक आहे. "Must Read" पुस्तक.  मी या पुस्तकाला रेटिंग देईन:


-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

Monday, July 2, 2012

असच काहितरी....!

                          आज सकाळी सलूनमधे  जाण्याचा योग आला. मांसाहेबांच्या आग्रहास्तव जावे लागले. :D . नेहमीचाच नाव्ही. "या साहेब. बसा!" असे आदबिने स्वागत झाले. नेहमीच म्हणजे अगदी लहान असल्यापासून त्याच्याच दुकानात जायचो. त्याने सांगितलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो. त्याची तयारी सुरू झाली. तेवढ्यात एक गृहस्थ आपल्या छोट्या मुलासोबत दुकानात आले. नेहमी प्रमाणे त्या नाव्ह्याने त्यांचेही "या साहेब बसा. अरे वा आज छोटेसाहेबपण आलेत. छान छान. बसा!" असे स्वागत केले.

                         ते गृहस्थ माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसले आणि त्यांच्या पलिकडच्या खुर्चीवर छोटेसाहेब बसले. तेवढ्यात त्या नाव्ह्याने कपाटावरचा स्टूल काढला आणि त्या छोट्या साहेबांना खुर्चीवरून उचलून खाली ठेवले. मग तो स्टूल त्या खुर्चीवर ठेवला आणि मग छोट्यासाहेबांना त्यावर बसवले. त्यामागचा हेतू हाच की नाव्ह्याला काम करताना उंची योग्य मिळावी.

                      क्षणात मला माझं लहानपण आठवलं. लहान असताना मी ही बाबांसोबत कटींगला जायचो. याच नाव्ह्याच्या दुकानात. तेव्हाही माझं "छोटे साहेब" असच स्वागत व्हायच. कोणीतरी आपल्याला "साहेब" म्हणतयं  मग ते "छोटे" का असेना पण "साहेब" म्हणतय हे ऐकुन खूप मस्त वाटायचं. :D आपोआपच मग माझ वागणं एखाद्या साहेबासारखं व्हायचं.  आधिच "साहेब" म्हटल्यामुळं मुठभर मांस वाढलेलं असायच पण तेवढ्यात तो नाव्ही हातात स्टुल घेऊन येताना दिसला की भयानक राग यायच. माहित नाही का? पण भयानक राग यायचा. खुर्चीवर स्टुल आणि स्टुलवर मी बसायच? साहेबानं बसायच तेही स्टुलावर? :-o अपमान! घोर अपमान वाटायचा. माझे बाबा पण "साहेब" आहेत! मग ते तेवढे खुर्चीवर डायरेक्ट बसणार आणि मला तेवढं स्टुलावर का? असा काहिसा विचार यायचा. पण काय करणार? आमचं थोडच काही चालायचं? कितीही इच्छा नसली तरी तो नाव्ही मला "उचलून" त्या स्टुलावर बसवायचाच! :D मग एक नाव्ही बाबांची कटिंग सुरू करायचा. बाबा त्याला काहिश्या सुचना करायचे, "हे असं काप, इथे जरा केस ठेव, वगैरे वगैरे" मग माझा नाव्ही बाबांनाच माझ्या कटींगबद्दल विचारायचा आणि बाबा म्हणायचे, "काही नाही, एकदम बारिक कर!". :-o परत अपमान! घोर अपमान! बाबा त्यांच्या नाव्ह्याला तेवढे  सुचना करणार  आणि माझ्या नाव्ह्याला काहिच नाही?? पण हे आमचं सगळं मनातल्या मनात. :))

                           माझी कटिंग लवकर संपायची. मग मी बाकड्यावर जाऊन बसायचो. बाबांची कटिंग अजून सुरूच असायची. मग नाव्ही काय काय करतो ते मी न्याहाळत बसायचो. बाबांची कटिंग झाली की मग बाबांची दाढी असायची. तो नाव्ही ब्रशने त्यांच्या गालावर फेस करायचा. ते बघुन खुप मजा यायची. तो नाव्ही ब्रश बाबांच्या गालावरून असा काही फिरवायचा की वाटायचं की एखाद मोरपिसच फिरतय! बाबांना गुदगुल्या होत नसतिल का? किंवा किती मज्जा वाटत असेल बाबांना  किंवा कसं वाटत असेल गालावर फेस लावल्यावर? वगैरे सतराशे साठ असले काहितरी प्रश्न मनात यायचे. :))  मग मनात विचार यायचा, "आपण कधी मोठे होणार? आपण कधी स्वतः नाव्ह्याला सुचना करणार? आपल्या गालावर कधी फेस लागणार?" :-/

                    तेवढ्यात नाव्ह्याने पाण्याचा स्प्रे डोक्यावर मारला आणि मी भानावर आलो. मग त्यानेच विचारलं "साहेब काय करू? मेडियम की बारिक? दाढी करायचिये का?" वगैरे, वगैरे! हम्म्म...! आता झालो मोठा. आता मला विचारलं जातं. आता मी स्टुलावर नाही तर डायरेक्ट खुर्चीवर बसतो. आता माझ्याही गालावर फेस केला जातो. पण खरच लहानपणच बरं होत. कशाची काही चिंता नाही. दाढीची कटकट नाही . बाबांच्या सोबत बिनधास्त जायचं. वेगळच "सेक्युर" वाटायचं.

                        कधी कधी असच काहितरी सुचतं. म्हटलं बघाव ब्लॉगवर टाकून आणखी किती जणांना असं वाटायचं..... :D बालिश जरी असलं तरी मला वाटतं आपल्या सगळ्यांत एक छोटं मुल नक्कीच कोठेतरी दडलेलं असतं जे असले काहितरी विचार डोक्यात आणत असतं! मला खात्री आहे की कधिना कधी माझ्यासारखच तुम्हालाही वाटलं असणारच! काय मग? बरोबर आहे ना? ;)

-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...