Monday, January 20, 2014

चार शब्द...!

आज जवळजवळ १ वर्ष झालं मला माझ्या ब्लॉगपासून दूर राहून. आजपासून पुन्हा ब्लॉगिंगला वेळ द्यायचे ठरवले आहे. त्यानिमित्ताने हे चार शब्द....!

तसं बघितलं तर बरच काही बदलल या वर्षभरात. काही आपले दुरावले तरी काही नवे जवळ आले. जे आपल्या अगदी जवळ हवे हवे असणारे, नजाणे का पण नजरेआड झाले. प्रत्येकाला आपली "स्पेस" हवी असतेच म्हणा. आसो! आशा आहे जे जवळ आहेत ते जवळच राहोत.

या वर्षाच्या सुरूवातीस मनात "संकल्पा"ची कल्पना आलेली पण दरवर्षी "न-होणारे" संकल्प करण्यापेक्षा ते न केलेलेच बरे अशी समजूत काढून त्यांपासून दुरच राहयचे ठरवले आहे (संकल्पच म्हणा ह्याला हवं तर). गेलं वर्ष तसं बघितलं तर फार काही चांगलं गेलं नाही पण का कोणास ठाऊक फारच लवकर गेल्यासारखं वाटतय. अजून २०१४ लिहायला हात वळतच नाहीये. होईल सवय हळू हळू. येणार्‍या वर्षात बरच काही अनुभवायला मिळणार याची खात्री आहे आणि मीही त्यासाठी तयार आहे.

असो..! भाषणातले नसंपणारे चार शब्द न बनवता ही पोस्ट इथेच उरकती घेतो. लवकरच भेटू नव्या पोस्टस सोबत! उशीरा का होईना पण तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :)

Friday, April 19, 2013

( मराठी चित्रपट ) प्रेमाची गोष्ट : मला नाही भावला!

आज जवळ जवळ १० महिन्यांनंतर ब्लॉग लिहितोय. बरच काही घडलं या कालावधित. त्यातिल काही किस्से नक्कीच शेअर करेन. पण आज ब्लॉग लिहायला घेतलाय तो नुकताच बघितलेल्या मराठी चित्रपटावर. सध्या मराठी चित्रपटांना सुगिचे दिवस आलेले दिसताहेत. "हिरवं कुंकु(?), माहेरचा शालू" वगैरे टिपिकल चित्रपटांना बाजूला सारून नविन धाटणिचे चित्रपट प्रदर्शित होताना पाहून नक्कीच चांगलं वाटतयं. काहींनी तर राष्ट्रिय पातळीवरिल पुरस्कार देखिल पटकवले आहेत. जिथे क्वचितच एखादा मराठी चित्रपट दिसायचा असा वर्तमानपत्राचा चित्रपट विभाग आजकाल मराठी चित्रपटांनी गच्च भरलेला दिसतो. खरच या गोष्टी सुखावणार्‍या आहेत.

मध्यंतरी फ़ेसबुकवर अतुल कुलकर्णी असल्याचे समजले. तसा मला आवडणार्‍या अभिनेत्यांपैकी एक. लागलीच त्यांना सब्स्क्राईब झालो. काही दिवसातच त्यांच्या अकाऊंटवर सतत " प्रेमाची गोष्ट" या शब्दाचा वापर वाढलेला दिसू लागला. पहिल्यांदा मला ते एखादं नाटक असावं किंवा टिपिकल मराठी सिरियल असेल असे वाटले पण जेव्हा अतुलजींनी हा फोटो अपलोड केला तेव्हा कल्पना आली की हा मराठी चित्रपट दिसतोय. त्यानंतर त्यांच्या अकाऊंटवर केवळ याच चित्रपटाची पब्लिसिटी होती. लवकरच प्रदर्शितही झाला. पहिल्यांदा जेव्हा हा पोस्टर पाहिला तेव्हा ती नायिका कोणीतरी नविन वाटली पण जेव्हा समजलं की ती घाटगे कन्या आहे तेव्हा पहिले तर विश्वासच बसला नाही. कारण "चक दे" मधला तिचा चेहरा आणि या चेहर्‍यात खुप फरक वाटला.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर विचारायलाच नको इतक्या लोकांच्या कमेंट्स अतुलजींच्या अकाऊंटवर बरसू लागल्या. इतक्या छान छान कमेंट्स वाचून लवकरच चित्रपट सहपरिवार पाहायच निश्चित केलं. त्यात राजवाडेंचे दिग्दर्शन म्हणजे "सोनेपे सुहागा"च असणार असा एक विश्वास वाटू लागला. एवढ कौतुक ऐकल्यानंतर आपोआपच माझ्या आपेक्षा खुपच वाढल्या. "मुंबई-पुणे-मुंबई" ने माझं मन जिंकलेलं त्यामुळे राजवाडेंचा हा चित्रपटही तसाच हिट असणार अशी एक आशा वाटू लागली. नेहमीप्रमाणे "घरगुती" कारणांमुळे चित्रपट पहायला सवड मिळालीच नाही. शेवटी "TV वर येइल तेव्हा पाहू" अशी स्वतःची समजुत काढून घेतली आणि खरच खुपच लवकर हा चित्रपट TV वर दाखवला गेला. गेल्याच आठवड्यात स्टार प्रवाहवर दाखवला गेला. (तो स्टार प्रवाहवर दाखवला जाणारे हे देखिल मला अतुलजींच्या अकाऊंटवरूनच कळालं :D ). मॉंसाहेबांच्या  डेली सोपच्या टाईट शेड्युलमधून कसा बसा वेळ काढला आणि सहपरिवार चित्रपट पाहायला बसलो.

आधीच आपेक्षा एवढ्या उंचावल्यामुळे सुरुवातीपासूनच नाविन्य शोधत होतो. कदाचित नविन कहितरी बघायला मिळणार हिच मानसिकता तयार झालेली. राजवाडेंच्या बाबतीतली एक गोष्ट मला खुप आवडली ती म्हणजे "सिंप्लीसिटी". कोणताही भव्यदिव्य सेट नाही, विनाकारण न पेलणारे खर्च नाहीत. फक्त पुर्ण फोकस चित्रपटातील पात्रांवर! सुरूवात बरी वाटत असतानाच घाटगे बाईंची एंट्री झाली. पोस्टर नक्कीच फोटोशॉप एडिट केले असणार याची क्षणात खात्री पटली कारण मुळात मला या बाईंचा चेहरा कधी "नायिका" म्हणून आवडला नाही. आसतिल या दिसायला सुंदर पण मला कधीच सुंदर वाटल्या नाहीत. तेवढ्यात या बाईंचा पहिला डायलॉग कानावर पडला. अरररर..........! चेहरा ठिक आहे पण कसला आवाज आणि कसलं मराठी. पुर्ण निराशा झाली. या बाईंना साधं नीट मराठीही बोलता येत नाही आणि आवाजात काही चढ-उतारही नाही. एखाद्या नाटकात काम करत असल्यासारखा यांचा अभिनय. एकिकडे अतुलजी. एक परफ़ेक्ट अभिनेता. सुरुवातीपासूनच ते त्यांच्या "कॅरेक्टर"मधे इन्हाल्व्ह झालेले दिसले. आवाजात योग्य चढ-उतार, अचुक क्रिया-प्रतिक्रिया या त्यांच्या अभिनयाने समाधान वाटले.

अनपेक्षितपणे राजवाडेंची एंट्री देखिल छान वाटली. असंभव मधिल त्यांचा अभिनय पाहिला होता त्यामुळे चांगल्या अभिनयाची आपेक्षा होती  आणि सपोर्टिंग रोल असुनही त्यांनी ती योग्य पद्धतीने पुर्ण केली. चित्रपट जसजसा पुढ जात होता तस तशा मला घाटगे बाई जास्तच खुपु लागल्या. सारखे मनात विचार यायला लागले की याच मिळालेल्या काय राजवाडेंना? त्यांच्या जागी कितीतरी चांगल्या नायिका मराठी फिल्म इंडस्ट्रिमधे आहेत. कदाचित मुक्ता बर्वे देखिल चालल्या असत्या किंवा गिरिजा ओक देखिल नक्कीच घाटगे बाईंपेक्षा त्यांच्या रोलला जास्त न्याय मिळवून देऊ शकल्या असत्या. असो. तसच सहन करत मी चित्रपट पाहात होतो. एकदोन गाणी कानाला श्रवणिय वाटली पण मेंदूपर्यंत गेली नाहीत. "कधी तु, का कळेना" इत्यादी गाणी थेट मेंदूपर्यंत गेली तशी ही गाणी खास वाटली नाहीत.

चित्रपटात अतुल कुलकर्णी हे कथालेखक दाखविले आहेत. त्यात त्यांचा एक डायलॉग काहीसा या आशयाचा आहे की "चित्रपट असा असावा की प्रेक्षक त्यात गुंतुन जाईल. पुढे काय होणार याची उत्सुकता राहिल" पण हिच मला या चित्रपटात असलेली कमतरता वाटली. मुळात ते लिहित असलेली कथाच या चित्रपटाची कथा असल्याने लागलीच पुढे काय होणार याचा सहज अंदाज बांधता येत होता. तरी कथेला "ट्विस्ट" द्यायचे प्रयत्न चांगले वाटले. संपुर्ण चित्रपटात झालेले कॅमेरावर्क, एडिटींग, दिग्दर्शन नक्कीच आवडले. चित्रपटाची "पिक्चर कॉलिटी" देखिल उत्कृष्ट आहे. चित्रपटातील इतर सहाय्यक कलाकारांचे अभिनयही उत्कृष्ट वाटले आणि त्यांच्या त्या सुंदर अभिनयामुळे घाटगे बाईंचा अभिनय मला जास्तच साधारण वाटू लागला.

ओव्हर ऑल पाहता चित्रपट ठिक वाटला. जेवढं कौतुक मी चित्रपट पाहायच्या आधी ऐकलेलं, वाचलेलं त्यामानाने तर अजिबातच हा चित्रपट मला भावला नाही. मला कल्पना आहे की अगदी क्वचितच लोक माझ्या मताशी सहमत असतिल  पण राजवाडेंच्याकडून मला कदाचित जरा जास्तच आपेक्षा असतात.

असो! मी या चित्रपटाला रेटिंग देईन: ३/५

Saturday, July 7, 2012

मास्टरपिस: I Too Had a Love Story


लेखक: रविंदर सिंग
भाषा: इंग्रजी (मराठी अनुवादाबद्दल माहिती नाही.)
प्रकाशन: Srishti Publishers & Distributors


मध्यंतरी परिक्षेच्या नादात वाचन पुर्णपणे बंद होतं. महिना-दोन महिने वाचन नसल्यामुळे आपोआपच काहितरी वाचावस वाटू लागलं. घरची आई-आजोबांनी वाचुन संग्रहित केलेल्या पुस्तकांची अतुल्य लायब्ररी जरी असली तरी जास्तीत जास्त पुस्तकं ही एकतर अध्यात्म ज्याचा माझ्याशी दुर-दुर चा संबंध नाही :D आणि ती सोडली तर राहिलेली थोडी फार जुनी-नवी पुस्तकं. पण वयाचा परिणाम म्हणा किंवा अचानक आलेली हुक्की पण "Love Story" वाचाविशी वाटू लागली. मित्रांकडेही काही पुस्तकं होती पण ती काय रुचली नाहीत. मग सहज फ्लिपकार्टवर सर्च केलं आणि "I Too Had a Love Story" हे National Best Selling Book च्या यादित दिसलं. पुस्तक खरेदी करणार्‍यांचे रिव्ह्यु वाचले तर सर्वांनी ४/५ स्टार दिलेले. मग कोणताही विचार न करता घेतलं विकत.

२ दिवसांत पुस्तक माझ्या हातात होतं. लगेच घेतलं वाचायला. प्रस्तावना वगैरे गाळून डायरेक्ट कथेलाच हात घातला. ४ इंजिनिअरिंगचे मित्र, बर्‍याच दिवसांनी एकत्र येतात. जवळ-जवळ ४ वर्षांनी. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात सेटल झालेला असतो. मग इकड-तिकडच्या गप्पा. वगैरे- वगैरे. सुरवात वाचल्यावर वाटू लागलं "च्यायला, अजुन एक " 5 point Someone" दिसतयं." थोडासा निराष झालो. पण आता घेतलयं एवढ्या हौसेने तर वाचलं तरी पाहिजेच! मग परत घेतलं वाचायला आणि तोच माझा सगळ्यात योग्य निर्णय ठरला असं म्हणायला हरकत नाही. I Too Had a Love Story या पुस्तकाला मी "एक मास्टरपिस" असं म्हणेन.

कथेचा नायक रविन म्हणजेच स्वतः लेखक रविंदर सिंग. एक पंजाबी इंजिनिअर. वेल एज्युकेटेड, वेल सेटल्ड पण अजुनही बॅचलर. मित्रांच्यात पैज लागते की कोण पहिले लग्न करणार! साधारण नायक हा लग्नाच्या विचारातही नसलेला पण मित्रांना त्याच्यावरच खात्री असते की "आमच्यात पहिले लग्न तुझेच होणार!". मग मित्रांच्यात इंटरनेट विश्वात घडणार्‍या नव्या क्रांती विषयी चर्चा होते आणि विषय निघतो "मॅट्रीमोनिअल साईट" म्हणजेच "विवाहसंस्था संकेतस्थळ" www.Shadi.com बद्दल. चौघांपैकी फक्त एकच मित्र या नव्या पद्धतिच्या बाजूने असतो तर नायकासह उरलेले तिघे त्याच्या विरोधात. पण तो मित्र या तिघांना पटवून देतो की आपण आपल्यासाठी कशी साथिदार हवी आहे हे दिलेल्या categories मधून अगदी एका click सरशी बघू शकतो वगैरे वगैरे. पण तरिही हे लोक काही त्याच बोलण ऐकून घेत नाहीत.

नंतर थोड्या दिवसांनी नायक सहज मजा म्हणून त्या संकेतस्थळावर स्वतःची प्रोफाईल बनवतो. नंबर वगैरे देतो, त्याला कशी मुलगी पाहिजे वगैरे माहिती भरतो. सगळ व्यवस्थित झाल्यावर ते संकेतस्थळ त्याला क्षणात त्याच्या अपेक्षा पुर्ण करणार्‍या मुलिंची यादी दाखवते. हा प्रकार पाहून तोही हदरतो की इतक्या झटक्यात माझी "ड्रिमगर्ल" तेही इतक्या "ऑपशन्समधे" ? मग त्यातल्या बर्‍याच जणिंशी संपर्क साधतो. काही उत्तर देतात. काहिना तो आवडतो तर त्याला त्यातली कोणिच नाही आणि एके दिवशी त्याची "परफेक्ट मॅच" त्याला भेटतेच.

त्या दोघांच्यात पहिले मैत्री आणि नंतर हळूहळू प्रेम होते. एकमेकांना प्रत्यक्षात कधिही न पाहता देखिल ते एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू लागतात. थकवणारे दोघांचे शेड्युल असले तरी रात्र-रात्र फोनवर गप्पा मारण्यात घालवू लागतात. त्यांचा रोमांस वा़चताना खरोखरच मजा येते. माझ्या नशिबी अजुनतरी असलं काही नाही आलं (लवकर येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना ;) )पण तरिही वाचताना खुप मजा आली. एक विशेष म्हणजे कोठेही "वासना" दिसली नाही आणि हिच या लेखकाबद्दलची आवडलेली गोष्ट. अगदी सरळ साधं निर्मळ प्रेम. आणि तेही इतकं की एकमेकांना न बघताही एकमेकांना साताजन्माचे जिवनसाथी मानू लागलेले.

पुस्तक खुप सुंदर सुरू होतं. ते दोघे एकमेकांसाठीच जणू बनले असतिल, कोणाची द्रुष्टच लागावी असं त्यांच प्रेम. पण काय कोणास ठाऊक त्यादिवशी मला कोणती विपरित बुद्धी झाली. अचानक बसल्या बसल्या प्रस्तावना वाचली. आणि त्यात लिहिलेलं "प्रत्येक प्रेमकहाणी ही पुर्ण होतेच असं नाही!" ..... बस्स......! माझ्या काळजाचा ठेका चुकला. हा काय प्रकार आहे? नेमकं काय झालं असेल त्यांच्या प्रेमाला? कोणाची नजर लागली असेल? नायिका नायकाशी "टाईमपास" तर करत नसेल? किंवा तिची ती प्रोफ़ाईल ज्यावर नायकाने विश्वास ठेवला ती खोटी तरी नसेल? की आणखी काही.....? सतराशेसाठ शंका मनात आल्या. एकेक पान वाचताना ह्रदयाचे ठोके जोरात धडधडू लागले. परिक्षा जवळ आल्यावर जशी भिती वाटते तशी काहिशी भिती वाटू लागली. आणि खरच सांगतो अशी प्रेमकथा कोण्या दुष्मनावरही येऊ नये. ;(

एखादी व्यक्ती जेव्हा दुसर्‍यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते, स्वतःचं आयुष्य जीच्यावर ओवाळून टाकते तिच व्यत्की जेव्हा मिळत नाही तेव्हा होणारे ते दुःख खरच अंगावर काटा आणते. माझ्यासारखा कठोर मनाचा (माझ्या आईच्या भाषेत "दगड" :)) ) असलेलाही वाचताना कित्येकवेळा डोळ्यात अश्रू काढतो यावरच या लेखकाची ही लेखणी किती प्रभावशाली असेल याचा अंदाज येतो. पुस्तकाचा शेवट नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी आणेल.

मला पुस्तक इतकं आवडलं की मी नेटवर आणखी माहिती काढायचा प्रयत्न केला. तेव्हा समजलं की ही त्या लेखकाची "सत्यकथा" आहे. मी त्या नायिकेचाही शोध घेतला. मजा म्हणजे त्या नायिकेचा फेसबुकवर "फॅनपेज" आहे आणि मी ही त्याला "Like" केलय! तेवढ्यात मला या कथेचा पुढचा भाग फ्लिपकार्टवर दिसला. आता तोही मागवला आहे. लवकरच वाचून त्याचाही रिव्ह्यु ब्लॉगवर प्रसिद्ध करतो.


का वाचावे
एक निर्मळ प्रेमकथा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे "सत्यकथा". माझ्या वयाच्याच काय पण अगदी प्रौढांनाही वाचताना मजा येईल. कदाचित त्यांच्या पर्सनल Love Stories ज्या पुर्ण झाल्या - नझाल्या त्या ताज्या होतिल. ;) खरच म्हणतात ना "Life never stops" . वाचताना आपणच नायक आहोत असा काहिवेळा मला भास झाला इतकं प्रभावी लेखन! माझ्यामते हे एक "Must Read" पुस्तक आहे.

का वाचू नये

तसे काहीच कारण नाही. आणि द्यायचेच झाले तर तुम्ही "ब्रम्हचारी" असाल तरच वाचू नका असे म्हणावे लागेल! :D :))
ओव्हरऑल खरच एक छान पुस्तक आहे. "Must Read" पुस्तक.  मी या पुस्तकाला रेटिंग देईन:


-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

Monday, July 2, 2012

असच काहितरी....!

                          आज सकाळी सलूनमधे  जाण्याचा योग आला. मांसाहेबांच्या आग्रहास्तव जावे लागले. :D . नेहमीचाच नाव्ही. "या साहेब. बसा!" असे आदबिने स्वागत झाले. नेहमीच म्हणजे अगदी लहान असल्यापासून त्याच्याच दुकानात जायचो. त्याने सांगितलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो. त्याची तयारी सुरू झाली. तेवढ्यात एक गृहस्थ आपल्या छोट्या मुलासोबत दुकानात आले. नेहमी प्रमाणे त्या नाव्ह्याने त्यांचेही "या साहेब बसा. अरे वा आज छोटेसाहेबपण आलेत. छान छान. बसा!" असे स्वागत केले.

                         ते गृहस्थ माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसले आणि त्यांच्या पलिकडच्या खुर्चीवर छोटेसाहेब बसले. तेवढ्यात त्या नाव्ह्याने कपाटावरचा स्टूल काढला आणि त्या छोट्या साहेबांना खुर्चीवरून उचलून खाली ठेवले. मग तो स्टूल त्या खुर्चीवर ठेवला आणि मग छोट्यासाहेबांना त्यावर बसवले. त्यामागचा हेतू हाच की नाव्ह्याला काम करताना उंची योग्य मिळावी.

                      क्षणात मला माझं लहानपण आठवलं. लहान असताना मी ही बाबांसोबत कटींगला जायचो. याच नाव्ह्याच्या दुकानात. तेव्हाही माझं "छोटे साहेब" असच स्वागत व्हायच. कोणीतरी आपल्याला "साहेब" म्हणतयं  मग ते "छोटे" का असेना पण "साहेब" म्हणतय हे ऐकुन खूप मस्त वाटायचं. :D आपोआपच मग माझ वागणं एखाद्या साहेबासारखं व्हायचं.  आधिच "साहेब" म्हटल्यामुळं मुठभर मांस वाढलेलं असायच पण तेवढ्यात तो नाव्ही हातात स्टुल घेऊन येताना दिसला की भयानक राग यायच. माहित नाही का? पण भयानक राग यायचा. खुर्चीवर स्टुल आणि स्टुलवर मी बसायच? साहेबानं बसायच तेही स्टुलावर? :-o अपमान! घोर अपमान वाटायचा. माझे बाबा पण "साहेब" आहेत! मग ते तेवढे खुर्चीवर डायरेक्ट बसणार आणि मला तेवढं स्टुलावर का? असा काहिसा विचार यायचा. पण काय करणार? आमचं थोडच काही चालायचं? कितीही इच्छा नसली तरी तो नाव्ही मला "उचलून" त्या स्टुलावर बसवायचाच! :D मग एक नाव्ही बाबांची कटिंग सुरू करायचा. बाबा त्याला काहिश्या सुचना करायचे, "हे असं काप, इथे जरा केस ठेव, वगैरे वगैरे" मग माझा नाव्ही बाबांनाच माझ्या कटींगबद्दल विचारायचा आणि बाबा म्हणायचे, "काही नाही, एकदम बारिक कर!". :-o परत अपमान! घोर अपमान! बाबा त्यांच्या नाव्ह्याला तेवढे  सुचना करणार  आणि माझ्या नाव्ह्याला काहिच नाही?? पण हे आमचं सगळं मनातल्या मनात. :))

                           माझी कटिंग लवकर संपायची. मग मी बाकड्यावर जाऊन बसायचो. बाबांची कटिंग अजून सुरूच असायची. मग नाव्ही काय काय करतो ते मी न्याहाळत बसायचो. बाबांची कटिंग झाली की मग बाबांची दाढी असायची. तो नाव्ही ब्रशने त्यांच्या गालावर फेस करायचा. ते बघुन खुप मजा यायची. तो नाव्ही ब्रश बाबांच्या गालावरून असा काही फिरवायचा की वाटायचं की एखाद मोरपिसच फिरतय! बाबांना गुदगुल्या होत नसतिल का? किंवा किती मज्जा वाटत असेल बाबांना  किंवा कसं वाटत असेल गालावर फेस लावल्यावर? वगैरे सतराशे साठ असले काहितरी प्रश्न मनात यायचे. :))  मग मनात विचार यायचा, "आपण कधी मोठे होणार? आपण कधी स्वतः नाव्ह्याला सुचना करणार? आपल्या गालावर कधी फेस लागणार?" :-/

                    तेवढ्यात नाव्ह्याने पाण्याचा स्प्रे डोक्यावर मारला आणि मी भानावर आलो. मग त्यानेच विचारलं "साहेब काय करू? मेडियम की बारिक? दाढी करायचिये का?" वगैरे, वगैरे! हम्म्म...! आता झालो मोठा. आता मला विचारलं जातं. आता मी स्टुलावर नाही तर डायरेक्ट खुर्चीवर बसतो. आता माझ्याही गालावर फेस केला जातो. पण खरच लहानपणच बरं होत. कशाची काही चिंता नाही. दाढीची कटकट नाही . बाबांच्या सोबत बिनधास्त जायचं. वेगळच "सेक्युर" वाटायचं.

                        कधी कधी असच काहितरी सुचतं. म्हटलं बघाव ब्लॉगवर टाकून आणखी किती जणांना असं वाटायचं..... :D बालिश जरी असलं तरी मला वाटतं आपल्या सगळ्यांत एक छोटं मुल नक्कीच कोठेतरी दडलेलं असतं जे असले काहितरी विचार डोक्यात आणत असतं! मला खात्री आहे की कधिना कधी माझ्यासारखच तुम्हालाही वाटलं असणारच! काय मग? बरोबर आहे ना? ;)

-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

Monday, April 2, 2012

हे दिवस परत कधी येणार???


अंड्याची हुशारी पुन्हा कधी अनुभवणार?
अन राजाची दादागिरी कोण विसरणार?
बंड्याचा "इमोशनल" झटका कोण सहन करणार?
अज्याचा वैचारिक फटका कोण विसरणार??
खरच हे दिवस परत कधी येणार???

राहुल्याटी सारखे "इ-अपडेट्स" कोण पुरवणार?
टंग्याच्या टंग्या कोण पचवणार?
पोप्या चॅटिंग कधी सोडणार?

खरच हे दिवस परत कधी येणार???

श्यागीच्या भन्नाट जोक्सवर पुन्हा कधी हसणार?
शितल्याचे "वन साईडेड फोटो" कोण काढणार?
धन्याच्या लॉजिकला चॅलेंज कोण देणार?
खरच हे दिवस परत कधी येणार???

किर्ल्याला कोणती आयटम मिळणार?
दिप्याला सर्टिफिकेट्स कशाचे मिळणार??
सेनाला ड्रायविंग कोण शिकवणार??
खरच हे दिवस परत कधी येणार???

आश्याच्या शिव्या कोण खाणार?
पशाला कोणता "डाव" आवडणार?
म्हैशाचं भविष्य कोण ऐकणार?

खरच हे दिवस परत कधी येणार???

अमल्याच "सचिन प्रेम" कोण सहन करणार?
मैर्‍याचं भन्नाट हास्य पुन्हा कधी ऐकणार?
अमर्‍या सबमिशन गुरु पुन्हा कधी होणार?
अन रंज्याच्या "स्किमा" कोणाला कळणार?
खरच हे दिवस परत कधी येणार???

सद्या नेमका कोणासोबत सेटल होणार?
बिल्डरला टिप्स कोण विचारणार?
विशल्याला खरं प्रेम कधी भेटणार
अन तेज्याचा जुना आवाज कधी ऐकणार?
खरच हे दिवस परत कधी येणार???

खुंख्याचे पॉईंट कोणाला कळणार??
राहुल्याएनला कॅज्युल मधे कधी बघणार?
वर्ध्यासारखी शांत व्यक्ती कधी भेटणार?
अन निर्‍याला कोण सांभाळणार??
खरच हे दिवस परत कधी येणार???


बघता बघता दिवस हे असे सरले,
न कळत अश्रू डोळ्यांत उरले.
दुःख म्हणू की काय मलाच कळत नाही,
पण तुम्हांसारखे "यार" सर्वांनाच मिळत नाहीत!



-अद्वैत उमेश कुलकर्णी

Monday, January 9, 2012

ड्रिमगर्ल.....!

सकाळ-सकाळी मस्त पेपर वाचत पडलो होतो. आजचे राशीभविष्य  "वाद संभवतात. वाहने सावकाश चालवा. आर्थिक लाभ संभवतो. एकतर्फी प्रेमात निराशा संभवते" आणि तेवढ्यात मोबाईल वाजयला लागला. आतल्या काचेच्या कपाटात ठेवला होता. कोणत्यातरी मित्राचाच असणार असे मानून तो उचलायला म्हणून उठलो. प्रोजेक्टचे काम सुरू आहे त्यामुळे त्यासंबंधीच काहितरी असणार असा डोक्यात काहिसा विचार येऊन गेला. मोबाईल बाहेर काढून कोणाचा आहे हे बघीतलं आणि दोन मिनिट बधीरच झालो. तो तीचा फोन होता! हो! खरच तीचा फोन होता. मी पुन्हा-पुन्हा स्पेलिंग चेक केलं, ते तिचच नाव होतं......

आपलं मन किती वेगात धावतं नाही? तो फोन वाजत असताना माझं मन तिच्या विचारातच बुडून गेलं. तिने आज पहिल्यांदाच स्वतःहुन फोन केला होता. तसा मीही थोडा लाजराच, त्यामुळे स्वतःहुन मीही कधी तिला फोन करत नाही पण एवढ्या सकाळी तिने फोन केला हा थोडा धक्काच होता. एकीकडे मन मस्त स्वप्नं बघत होतं आणि अचानक एका विचाराने सगळा काळ स्तब्ध झाल्यासारखा वाटला. मघाशी वाचलेलं भविष्य आठवलं!!  आजचे राशीभविष्य ;एकतर्फी प्रेमात निराशा संभवते. 

"माझ्या तिच्या विषयीच्या feelings तिला कळाल्यातरी नाहीत ना?" हाच प्रश्न डोक्यात अचानक पैदा झाला. काहीच कळत नव्हतं.  तसं झालं असेल तर हा कॉल तिने चिडून तरी केला नसेल ना? आणि सांगितलं तरी कोणी सांगितलं? कारण तिच्या बद्दलच्या माझ्या feelings मला आणि माझ्या बेस्टफ्रेंडसनाच माहितीयेत आणि त्यांच्याकडून तिला कळणं तसं अशक्यच. आणि ती जर खरच चिडली असेल तर ती आमची इतक्या वर्षांची मैत्री तरी तोडणार नाही ना? माझ्या एका बावळटपणामुळे  खरच माझी एक मैत्रीण मी गमावणार तरी नाही ना? अशा असंख्य प्रश्नांनी डोक्यात घरं करायला सुरूवात केली.

तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजून वाजून बंद झाली. मी थोडासा बिथरलेलो. त्यामुळे फोन miss झाल्याचा किंचित आनंदच झाला. मनाची तयारी करत होतो. चिडली असेल तर कशी समजूत घालायची..... कशी माफी मागायची... वगैरे वगैरे! तेवढ्यात पुन्हा फोन वाजयला लागला. पुन्हा तिचाच होता. मनाशी ठरवलं की काहीही होऊदे फोन उचलायचाच.

थोडा घाबरत घाबरतच उचलला...

"हॅलो! अद्वैत?"
स्स्स्स्स्स्स!! तिचा तो मस्त नाजूक आवाज! वाटलं ऐकतच राहावं, बोलूच नये!
"हहह... हॅलो!"
"हॅलो! कायरे? कुठे गायब होतास? फोन का उचलला नाहीस?"
"ते मी, मी, ते, जरा बबब..बाहेर होतो."
"बरा आहेस ना? असा का अडखळतो आहेस?"
"नाही तसं काही नाही, मी मस्त आहे. बोल काय काम काढलस?"
"का रे? कामाशिवाय कॉल करू शकत नाही काय कोणी?"

आता मला काहीच सुचत नव्हतं. एक तर असा अचानक कॉल आणि त्यात ती चिडल्यासारखीही वाटत नव्हती. आणि आतातर अगदी जीवाभावाची मैत्री असल्यासारखी बोलत होती. का कोणास ठाऊक पण थोडं awkward वाटत होतं. कारण माझ्या फोनला आणि माझ्या कानांना असल्या नाजूक शब्दांची सवयच नाही! कारण मला कॉल करणारे माझे परम् मित्रलोक एखादी सणसणीत कोल्हापूरी शिवी घातल्याशिवाय पुढे बोलतच नाहीत. तशी स्टाईलच आहे इकडे. त्यामुळे हे असे शब्द जरा नविनच होते.

"अगं तसं नाही ग! आज पहिल्यांदाच कॉल केलास ना! म्हणून मला वाटलं काही काम काढलस काय माझ्याकडं"
"अरे नाही रे. कॉलेजचे जुने फोटो बघत होते. तु दिसलास. So आठवण झाली म्हणून केला कॉल. तु काय कधी करत नाहीस, मग म्हटलं मीच करावा!"

आतातर मी जाम खाली पडायचाच राहिलो होतो. हे काय घडतय माझ्यासोबत? आठवण? आणि तिला? आणि तीही माझी? अरे हे काय नेमकं चाललय तरी काय?

"माझी आठवण? काहीच्या काही! एवढं आमचं नशीब कुठे? बाय द वे कोणते फोटो?"
"तुम्हाला येत नसली तरी आम्हाला येते आमच्या फ्रेंड्सची आठवण. अरे ते फोटो आपल्या फर्स्ट इयरच्या कार्यक्रमाचे आहेत रे. काहीतरी समाजसेवा करायला गेलो होतो की आपण सगळे जवळच्या गावी. तिथले आहेत. सहज कपाट आवरताना दिसले. बोल, आणखी काय चालू आहे सुट्टीत?"
"अरे बापरे! ते फोटो आहेत होय तुझ्याकडं! ग्रेट! बाकी काही नाही बघ ! निवांत आहे. सध्या प्रोजेक्टचे काम जोरात सुरू आहे. फुल्ल बिझी आहे त्यात. कदाचित या सेमिस्टरला कॉलेज करणारही नाही. बहुतेक तशी परवानगी मिळेल आम्हाला कॉलेजकडून कारण तसा प्रोजेक्ट आहेचे आमचा!"
"भारीये बुवा तुमचं"
"मग? वाटलो काय तुला आम्ही?"
"मी तरी एक दिवस सुद्धा कॉलेज बंक करणार नाही. आफ्टरऑल लास्ट सेमिस्टर आहे आपली. पुन्हा आयुष्यात कुठे कॉलेज करणारे? आणि कोण फ्रेंड कुठे भेटेल किंवा भेटेल की नाही हे काहीच सांगता येत नाही."
"हम्म्म.. खरय तुझ! आम्ही तरी सध्या फुल्ल एंजॉय करतोय बघ! बाकी ? बोल आणखी काय नविन?"
"काही नाही. भरपुर शॉपिंग केली या वेळी. बाबांच्या खिशाला मोठी कात्री लावली. भरपुर ड्रेस घेतले. ज्वेलरी घेतली. नुसती खरेदी केली."
वगैरे , वगैरे....
असे इकडचे-तिकडचे भरपुर बोलणे झाले. माझा मलाच विश्वास बसत नव्हता की मी एखाद्या मुलीशी बोलू शकतो आणि तेही अर्धा तास? सटर-फटर गप्पा झाल्यानंतर तिच्या एका वाक्याने मी सुन्न झालो...

"मग कधी भेटुयाल?"

मी खरच नीट ऐकलं ना? की माझे कान वाजले?

"काय म्हणालीस?"
"अरे मी म्हणाले कधी भेटुयात? बरेच दिवस झाले भेटलो नाहीत आपण."


आता मात्र माझी अवस्था बघण्यासारखी होती. माझ्या फिलिंग्स तिला नक्की कळाल्या आहेत आणि बहुतेक तिचाही होकार आहे असा काहिसा विचारही मनात येऊन गेला पण परत मनाला आवरलं! उगाच तिच्या मनात निर्मळ मैत्री असेल आणि माझ्या या बावळटपणामुळे त्यावर मला पाणी पडू द्यायच नव्हतं.

"भेटुयाल? बरी आहेस ना? असच एकदम काय सुचलं? "
"अरे काही नाही. असच वाटलं भेटावसं. म्हणून. आणि तुला काही हरकत असेल तर राहुदे"

हरकत? आणि मला? ती कशाला असेल?

"अगं नाही नाही. तसं नाही. मी कॉलेजला दररोज येतोचे प्रोजेक्टसाठी. भेटूयाल कॅंटिनमधे!" 
"ए.. नाही. कॅंटिनमधे नाही. तुझ्या त्या ग्रुपने आपल्याला पाहिलं तर गावभर करतील आणि काहीपण चिडवतील"
"ए! तसे नाहीयेत माझे मित्र. तशी चेष्टा चालायचीच की. असो! तुला नको असेल तर राहुदे. नको कॅंटिन. मग कुठे भेटायच?"
"उद्या संध्याकाळी ६ वाजता CCD ला"

Cafe Coffee Day? तेही आम्ही दोघं? म्हणजे थोडक्यात Date वर जायच? धक्यांवर धक्के! अरे काय चाललय काय?

"ठिके. मी येतो."
"ग्रेट. मग भेटु उद्या! chal bye Cya take care"

फोन बंद झाला होता!पण तो तसाच कानाला धरून ठेवावा वाटत होता. तिचा एकन एक शब्द कानात घुमत होता. हे माझ्याबाबत घडलयं याचं feeling काहीतरी वेगळच होतं.

दिवस कधी संपतोय आणि कधी एकदा उद्याची संध्याकाळ येते असं झालं. कसा बसा दिवस संपला. आणि बघता बघता ती संध्याकाळही आली. बरोबर ६ वाजता मी CCD मध्ये मस्त तयार होऊन आलो. अजुन ती यायची होती. येताना तिच्यासाठी एक मस्त फ्रेंडशीपवर आधारित ग्रिटिंग घेतलं. दोघांच्यासाठीचाच असलेला टेबल धरून तिची वाट पाहत बसलो.

तेवढ्यात हाक ऐकू आली,

"अद्वैत! अरे अद्वैत. राजा उठ"

आई???????????? इकडे????? तिला कोणी सांगितलं? मी तर गुपचुप आलोय निघुन? मग ती इकडे कशी? आणि उठ का म्हणतिये?

"अरे बघ साडेनऊ वाजले. कितीवेळ झोपशील"

आणि गदागदा मला तिने हलवल... मी ताडकन उठून बसलो. मला काहीच कळत नव्हतं. वर पंखा, शेजारी PC , बाजूला खिडकी आणि खाली...... खाली गादी??? बोंबला! म्हणजे मी स्वप्न बघत होतो. लगेच मोबाईल चेक केला. कॉल हिस्टरी चेक केली, त्यात तिचा कॉल आल्याची कोणतिही नोंद नव्हती. म्हणजे हे सगळ माझं स्वप्न होत? अरेरेरेरेरेरेरे!! भयानक वाईट वाटलं ! आई माझ्याकड शंकेने बघत म्हणाली,

"काय झालं रे? असा चेहरा का पडलाय? काय वाईट स्वप्न पडलं होतं का?"

वाईट??????? अगं आई काय स्वप्न पडलं होतं ते तुला कसं सांगू!! अंग जड झाल्यासारख वाटत होतं. कसाबसा बिछान्यावरून उठलो. तेवढ्यात शेजारच्या दुकानातल्या रेडिओवर गाण लागलं,

"छनसे जो टुटे कोई सपना.........
जग सुना सुना लागे... जग सुना सुना लागे रे................"

-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

Sunday, October 30, 2011

पुस्तक परिक्षण: जॉनी गॉन डाऊन

नमस्कार मंडळी, मध्यंतरी प्रोजेक्ट प्रेसेंटेशनसाठी बेंगलोरला आम्ही गेलो होतो तेव्हा माझा मित्र अजित उपाध्येने हे पुस्तक खरेदी केले. त्यादिवशी महाराष्ट्र मंडळात बसुन पुस्तक सहज चाळलं. प्रोलॉग जरा प्रॉमिसिंग वाटला म्हणून अजितला पुस्तक "वाचून देतो" अशी रिक्वेस्ट केली आणि ती त्याने अगदी झटक्यात मान्य केली. त्यामुळे सर्वप्रथम अजितला धन्यवाद! :) या पोस्टपासून मी या ब्लॉगवर, वाचलेल्या पुस्तकांची परिक्षणे देखिल लिहिणार आहे. हा नवा प्रयत्न कसा वाटला हे नक्की कळवा

पुस्तक परिक्षण: जॉनी गॉन डाऊन

लेखक: करण/न बजाज
भाषा: इंग्रजी (मराठी अनुवादाबद्दल माहिती नाही.)
प्रकाशन: Harper Collins



"किप ऑफ द ग्रास" या गाजलेल्या पुस्तकाच्या लेखकाचे म्हणजेच करण/न बजाजचे हे दुसरे पुस्तक. वर म्हटल्या प्रमाणे प्रोलॉग अगदी प्रॉमिसिंग आहे. एखाद्या इंग्रजी सिनेमा असल्यासारखं पुस्तक कथेच्या मध्यातुन सुरू होतं. एक हात गमावलेला, अंगावर अगदी मळके कपडे असलेला कथेचा नायक भारतीय रेल्वेतुन प्रवास करत असतो. सहजच रेल्वेतील सहप्रवाशांशी गप्पा होतात. कथेचा नायक अगदी शांत, कदाचित "जीवनाच्या परम सत्यापर्यंत" पोहचल्यासारखा गंभीर असा वर्णीला आहे. रेल्वेतील संभाषणात तो "फ़ॉरेन रिटर्न" आहे हे सहप्रवाशांना पटत नाही. इतकी दयनीय अवस्था पाहता हे शक्यच नाही असा काहींचा समज होतो तर एक गृहस्थ, "बघा, परदेशात जाऊन ही अवस्था होत असेल तर त्यापेक्षा भारतच बरा" असा टोमणाही मारून जातात. पण नायकाला त्याची फिकिर नसते. तो अलिप्त असतो. त्याच्या क्वचितच बोलण्यात तो स्वतः "MIT" या जगविख्यात इंजिनिअरिंग कॉलेजचा ग्रॅज्युएट असल्याचे सांगतो आणि तेथुन पुढे कथा सुरुवातिला येते.

कथेची सुरुवात आणि प्रोलॉगची स्टाईल नकळतच चेतन भगतच्या "फाईव्ह पॉईंट समवन"ची आठवण करून देते. साधारण त्याच धाटणीची लेखन शैली, त्याच पद्धतीचे "कॉलेज लाईफ" संवाद, वाचायला मिळतात. फरक एवढाच आहे की या पुस्तकात "फ"काराने सुरू होणार्‍या शिव्या आणि नंतर ब्राझीलमध्ये नायक वास्तव्याला असताना टिपिकल माफ़िया स्टाईलच्या लेखनामुळे आलेले भरपुर "सेंसॉर्ड" शब्द मुक्त हस्ताने वापरले आहेत. त्यामुळे  "जेंटलमन" वाचक वर्गाला कदाचित ते पचणार नाही. ;)

तर कथेची सुरुवात MIT च्या कॉन्व्होकेशन सेरेमोनीत होते. कथेचा नायक निखिल आणि लंगोटीयार सॅम यांचे भन्नाट संवाद खरोखर मजा आणतात.या दरम्यान ते कंबोडियाला सुट्टी एंजॉय करायचा प्लॅन करतात. कंबोडिया का तर स्वस्त आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे तेथे व्हिसा लागत नाही म्हणून. दरम्यान निखिल NASA मध्ये सिलेक्ट झालेला असतो तर सॅम GE (General Electric)मध्ये. थोडक्यात दोघेही मोठ्या कंपनीत सिलेक्ट झालेले असतात.

आणि कथेला कलाटणी मिळते जेव्हा ते कंबोडियात येतात. कंबोडियाची सध्याची राजकीय परिस्थिती न पाहता ते तेथे दाखल होतात आणि मग सर्व परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. कंबोडियात राजकिय अस्थिरता असते आणि ज्यामुळे नव्याने हुकुमशाहा उदयास आलेला असतो. जो त्याच्या वाटेत येईल ते सर्व उध्वस्त करत सुटलेला असतो. आणि अशा बिकट स्थितीत हे दोघे तेथे जातात. लवकरच स्थितीचे गांभीर्य़ त्यांच्या लक्षात येते. केवळ सॅमच्या हट्टापायी ते येथे आलेले असतात ज्यामुळे सॅमला प्रचंड मनस्ताप होतो. बर्‍याच गोष्टी घडतात. मग ते मदतीसाठी अमेरिकन एंबसीत जातात आणि तिथे लक्षात येते की निखिलचाच पासपोर्ट NASA ने अमेरिकी नागरिक म्हणून केलेला असतो तर GE ने अजुन सॅमला तसा पासपोर्ट दिलेला नसतो. आणि भारतीय एंबसीच तेथे नसते.  तेव्हा निखिल मनाचा मोठेपणा दाखवून आणि उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत सॅमला स्वतःचा पासपोर्ट देतो आणि त्याला अमेरिकेला परत पाठवतो आणि स्वतः  इतर नॉन अमेरिका पासपोर्ट धारकांबरोबर जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो.

तो कंबोडियन हुकुमशाही सैनीकांकडे पकडला जातो. १० वर्ष त्याचे भयानक हाल केले जातात. केले गेलेले हाल वाचताना अंगावर काटा येतो. तरिही तो त्यातुन पळ काढण्यात यशस्वी होतो. दरम्यान त्या छळात तो स्वतःचा एक  हातही गमावतो. नंतर तो रात्रंदिवस पळत-पळत थायलंडला पोहोचतो. तेथे तो बुद्ध धर्मगुरू होतो. ७-८ वर्ष धर्माची शिकवण घेतली तरी त्याचे मन त्यात रमत नाही. ते सर्व सोडून तो ब्राझील मधे जातो. तेथे त्याची भेट ड्रग माफिया मार्कोशी होते. एका कठीण प्रसंगी तो मार्कोचा जीव वाचवतो आणि लवकरच त्याचा पक्का मीत्र बनतो. बुद्धीच्या जोरावर तो मॉर्कोला नवा बिजनेस तयार करून देतो ज्यामुळे मॉर्को श्रीमंतीची शिखरे सर करतो. हळू हळू तो नकळत ब्राझीलमध्ये एक डॉन/माफिया म्हणून ओळखला जाऊ लागतो. माफिया बनल्यामुळे साहजीकच सतत जीवाशी खेळ. बर्‍याच गोष्टी घडतात ज्यामुळे त्याला ब्राझील सोडावे लागते व अमेरिकेत पुन्हा पळ काढावा लागतो. दरम्यान त्याला त्याचे प्रेम मिळते, मुल होते पण त्यांना सोडून त्याला अमेरिका गाठावी लागते.

मनावर सतत झालेला छळ, मिळालेली धर्मगुरूंची शिकवण आणि मनुष्यप्राण्याची पाहिलेली नवी रुपे त्याला गंभीर, घाबरट बनवतात. अमेरिकेत तो एका कंप्युटर गीक/किडयाला भेटतो. हळू हळू प्रोग्रामिंग शिकतो.पुन्हा स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर करोडो रुपये मिळवता येतिल अशी वेबसाईट बनवतो पण पुन्हा स्वतः कही प्रॉफिट न घेता ती साईट त्या कंप्युटर गीकला सोपवून तो भारतात "मरण्याच्या" उद्देशाने येतो. बर्‍याच गोष्टी घडतात, आणि एक दिवस तो पुन्हा सॅमला भेटतो......

नंतर काय होते ते मी सांगत नाही. कारण बरच मी आधीच सांगितलं आहे. पण ओव्हरऑल एक छान पुस्तक आहे.

का वाचावे
-पुस्तक स्टार्ट-टु-एंड वाचकाला खिळवुन ठेवते. "पुढे काय" असा सतत प्रश्न वाचकाला पाडण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
-एका भारतिय लेखकाने लिहिलेले माझ्या वाचनात आलेले हे सर्वोत्तम इंग्रजी पुस्तक आहे. वापरलेल्या वाक्यरचना, शब्द खरोखरच जेफ्री आर्चर वगैरे दिग्गज इंग्रजी लेखकांची आठवण करून देतात. तितकेही मुरलेले लेखन नाही पण मी तरी या लेखनावर इंप्रेस झालो.

का वाचू नये
-कथेत नायकाच्या जिवनाला मिळणार्‍या कलाटण्या, भरपूर योगायोग, जेम्सबॉंड स्टाईलने अशक्य अशा संकटांवर होणारा विजय, इत्यादी गोष्टी पटत नाहीत. एक कथा म्हणून ठीक आहे पण "इमॅजनरी" लेखन असल्याने ह्या उणीवा राहिल्या आहेत.
-वर म्हटल्याप्रमाणे "फ"कारार्थी आणि सेंसॉर्ड शब्दांचा मुक्त हस्ताने वापर काही क्षणी विनाकारण केल्यासारखा वाटतो.


ओव्हरऑल खरच एक छान पुस्तक आहे. एकवेळ आवश्य वाचण्यासारखे आहे. माझ्या मते मी या पुस्तकाला रेटिंग देईन:
 



Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...