Wednesday, March 30, 2011

फक्त मीच!

तुझ्या देखणेपणावर मरणारे हजार असतिल
पण तुझ्या निर्मळ मनावर मरणारा फक्त मीच!

तुझ्या हसण्यावर फिदा हजार असतिल
पण तुला मनापासून हसवणारा फक्त मीच!

तुझ्या चिडण्यावर चिडणारे हजार असतिल
पण तुला मनसोक्त चिडवणारा फक्त मीच!

तुझ्या सुखात भागिदार हजार असतिल
पण तुझ्या दुःखात हक्काचा भागिदार फक्त मीच!

तुझ्या अदांना पाहणारे हजार असतिल
पण "तूला" पाहणारा फक्त मीच!

तुझ्या कळत तुझ्यावर प्रेम करणारे हजार असतिल
पण तुझ्याच नकळत तुझ्यावर प्रेम करणारा फक्त मीच! फक्त मीच!


-अद्वैत
http://www.marathicorner.com/memberblogs/

Tuesday, March 29, 2011

"सकाळ"नेही घेतली मराठी कॉर्नरची दखल

दिनांक २५ मार्च २०११ च्या सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये मराठी कॉर्नरवर आधारित श्री. प्रफुल्ल सुतार यांचा एक सुंदर रिव्ह्यू छापून आला आहे.

त्याचा दुवा: http://72.78.249.107/Sakal/25Mar2011/Enlarge/Kolhapur/KolhapurToday/page8.htm


कात्रण:



श्री. प्रफुल्ल सुतार यांचे मनापासून आभार. छोट्या पण सुटसुटीत शब्दात त्यांनी खुप सुंदर परिक्षण केले आहे!

-अद्वैत
मराठी कॉर्नर

Thursday, March 24, 2011

आपल्याला अधिकार आहे?


आज २३ मार्च. ८० वर्षांपूर्वी तिघा क्रांतिकारकांना इंग्रज सरकारने फाशी दिली; का तर त्यांना कायमचे संपवून टाकण्यासाठी पण हेच तिघे भारताच्या इतिहासात कायमचे अजरामर झाले. आजचा दिवस शहिद दिन म्हणून ओळखला जातो. शहिद भगतसिंह, शहिद राजगुरू, शहिद सुखदेव यांनी दिलेल्या बलिदानाचे हे जणू प्रतिकच आहे. पण खरच या महान क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आपल्याला आधिकार आहे?

आज न्यूज चॅनल पाहात होतो, शहिद दिनाबद्दल बोलण्यासाठी काही मंत्री आतिशय हापापले होते. कोण म्हणत होता, "वो बहुत बडे वीर थे!" , "हम उनके बदौलत यहा है" वगैरे वगैरे! पण खरच त्यांची लायकीतरी आहे या वीरांबद्दल बोलण्याची? जो देश स्वतंत्र व्हावा म्हणून या लोकांनी हसत हसत बलिदान दिले, अशा या देशात एका खुर्चीसाठी हो्णारे वाद, सामान्यमाणसाला कळूही शकणार नाही इतक्या मोठ्या रकमेचे घोटाळे, भ्रष्टाचार, जातीभेद, नोंदी केल्या तर एखादा ग्रंथ तयार होईल असे प्रकार खरच त्यांच्या या बलिदानाची कुचेष्टा करत आहेत! या सर्व गोष्टींना फक्त आणि फक्त आपणच जबाबदार आहोत! मग त्यांच्या या कर्तुत्वाची आठवण व्यक्त करण्याचा आपल्याला अधिकार आहे?


भगत सिंहांना फाशीला नेत असताना त्यांच्याकडे काही कविता होत्या. त्यातिल एक:

भला निभेगी तेरी हमसे क्यों कर ऍ वायज़
कि हम तो रस्में मोहब्बत को आम करते हैं
मैं उनकी महफ़िल-ए-इशरत से कांप जाता हूँ
जो घर को फूंक के दुनिया में नाम करते हैं।

काय फरक आहे आपल्यात आणि शहिद भगतसिंगांनी रचलेल्या या कवितेत?  "जो घर को फूंक के दुनिया में नाम करते हैं।" . आपण नेमके हेच करतो आहोत असे वाटत नाही?

आज सर्वत्र त्यांच्या फोटोंचे पुजन होत होते, "इंकलाब झिंदाबाद"चे नारे लागत होते पण खरच हा सर्व दिखावेपणा नाही वाटत? भ्रष्ट सरकाराचे जुलुम सहन करून देखिल गप्प बसणारे आपण कोणत्या अधिकाराने या शहिदांच्या बलिदानाची आठवण व्यक्त करतो?

शहिद दिन आणि क्रांतिकारक दिन हे दोन दिवसच हवेत त्यांच्या क्रांतीच्या तेजाची आठवण ठेवण्यास? ज्यांना साधी भारताची प्रतिज्ञा सोडा राष्ट्रगीतही माहित नाही अशा मेट्रोसिटीतल्या तरुणांकडून जणू काही हे दोन दिवस "साजरे" केल्यासारखेच वाटतात! अरे लाज वाटली पाहिजे या अशा दिखावेपणाची!


गप्प आहे देश सारा
गप्प आहे आमचा स्वाभिमान!
नेतृत्वही लज्जास्पद आहे,
भ्रष्ट आहेत भावना!

एकमेकांस दोष देत
माणूसकीही ओशाळली आहे,
बुद्धीजिवी असू खरे पण
ही किड काही संपेना!

व्यर्थ गेले  प्रयत्न आमचे
व्यर्थ गेले आमचे बलिदान,
ही भावना न राहो त्यांच्या मनी
हीच देवा चरणी प्रार्थना!


-अद्वैत

Sunday, March 20, 2011

लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११: निकाल!

नमस्कार,
आज "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चा निकाल घोषित करताना मनापासून आनंद होत आहे. २२ ऑक्टोबर,२०१० ला मराठी कॉर्नरचे उद्घाटन झाले आणि केवळ ४ महिन्यांत मराठी कॉर्नरच्या सभासदांची संख्या १८० हुन अधिक झाली. ही खरच अभिमानाची गोष्ट आहे. कारण केवळ इतक्या कमी वेळेत एवढी लोकप्रियता लाभणे आम्ही भाग्याचे समजतो. आपल्या कविता आणि चारोळी विभागाचे संचालक/मॉडरेटर श्री. आमोल देशमुख यांनी मराठी कॉर्नरवर एखादी स्पर्धा भरवावी असा आग्रह धरला. प्रथम थोडी चिंता वाटली की खरच कितपत यशस्वी ठरेल मराठी कॉर्नरवर एखादी स्पर्धा ? तरिही त्यावर विचार करून, मराठी कॉर्नर टिमशी चर्चा करून "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चे आयोजन करण्यात आले. आणि गर्वाने सांगावेसे वाटते की आपल्या सभासदांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे.

मराठी कॉर्नरवरिल ही पहिलीच स्पर्धा होती पण तरिही जसा उत्तम प्रतिसाद लाभला आहे त्यावरून आम्ही आपल्याला खात्री देतो कि यापुढे वरचेवर अशा स्पर्धा नक्की आयोजित करू.आपला उत्स्फुर्त प्रतिसाद असाच मिळो ही देवा चरणी प्रार्थना.

सर्वप्रथम निकाल जाहिर करण्याआधी आपल्या मान्यवर परिक्षकांचे आम्ही आभार मानतो. या स्पर्धेचे परिक्षण करण्यासाठी आम्हाला श्री.श्रीकृष्ण सामंतजी, श्री. उल्हास भिडेजी व सौ. पल्लवी कुलकर्णीजी यांनी त्यांच्या बिझी शेड्युल मधून वेळ काढला त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू.

सर्व सभासदांनी खुपच छान लेख लिहुन पाठवले आहेत.विषयाची विविधता बघुन खुप छान वाटले.आपल्यातुन फ़क्त एकच लेख निवडणे तसे परिक्षकांची ही खरी परिक्षा होती असे म्हणावे लागेल.दिलेला पहिला नंबर जरी एकाला दिला गेला असला तरी खरे तर सारेच विजयी आहेत.कारण आपण यात सहभाग घेतलात आणि आपल्या मराठी कॉर्नरची शान वाढवलीत.तिला योग्य तो सन्मान दिलात,ह्यातच सर्व सभासदांचे यश सामावले आहेत.आम्हालाही खुप विचार वाचायला मिळाले.आपण सर्वांनीही सर्वांचे लेख वाचुन त्यावर प्रतिक्रीया लिहावी,कारण आपल्या लेखाला काय प्रतिक्रीया आली हे बघणे लेखकाला नक्कीच प्रोत्साहित करते.



"लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चा थोडक्यात सारांश
एकूण सहभागी झालेले लेख : २०
सर्व लेख येथे वाचायला मिळतिल: http://www.marathicorner.com/viewforum.php?f=36

1. संजयचा खून आणि… (कमलेश कुलकर्णी)
2 महिमा अंगठीचा (चेतन सुभाष गुगळे)
3 पिंपातले जगणे आहे आपले (शैलेंद्र शिरके)
4 तुझ्यामुळे .........तुझ्यामुळे (सौ. निवेदिता वाळिंबे.)
5 आमचा बैल भरल्या जाणार आहे (विश्वास भागवत )
6 एअर इंडिया च्या फ्लाईट पर्सरचा धिंगाणा .......दही भाता साठी.(मा. ना . बासरकर. )
7 मराठीसाठी कोपरा ( अरविंद खानोलकर)
8 शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल (प्रकाश पोळ)
9 पूर्वी आणि आता (Kedar Dipak Lasane)
10 द लास्ट किस ! (दीपक परुळेकर)
11 गंधवार्ता.....! (गंगाधर मुटे)
12 २६/११ च्या निमित्ताने.................................. (Nivedita Patil)
13 ओळख --- ' स्व ' ची जाणीव (सौ.बागेश्री प्रशांत येवारे)
14 स्त्री जन्मा.... (प्रमोद सावंत)
15 मानपान (Jayant Aloni)
16 "आपली मराठी (Shraddha Hegiste)
17 लेखमाला स्पर्धा - "असेल रंभा घायाळकर...... पण नाद नाय करायचा (धुंद रवी)
18 विकेट (सागर कोकणे)
19 वसुधालय... माझे साहस! (वसुधा चिवटे)
20 "माज्या मनात आयुष्यभर राहणारी खंत" कमलेश वसंत गायकवाड

आणि विजेता लेख आहे


श्री.चेतन सुभाष गुगळे यांचा महिमा अंगठीचा

पुन्हा लवकरच नवीन उपक्रमा बद्दल नक्की कळवु.आपल्याही सुचनांचे http://www.marathicorner.com/viewforum.php?f=7 इथे स्वागत आहे.
श्री.चेतन गुगळे यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन! त्यांना त्यांचे बक्षिस लवकरच पोच होइल.


पुन:श्च एकदा सर्वांचे अभिनंदन आणि आभार!!!!

कळावे,
मराठी कॉर्नर टिम.

Friday, March 11, 2011

एक उनाड दिवस!

                आज नेहमीप्रमाणे कॉलेजला निघायची तयारी करत होतो. का कोणास ठाऊक मला आज उत्साहच वाटत नव्हता. तरिही गाडीवर टांग मारली आणि स्वारी कॉलेजच्या गेटवर येऊन धडकली. लांबूनच गेट समोर गर्दी दिसत होती, म्हटलं काही तरी लोचा झाला आहे. तेवढ्यात मयर्‍या (मयुर लाडाने मयर्‍या) कंपाऊंडवरून उडी मारून आत जाताना दिसला. त्याला थांबवून काय भानगड झालिये हे माहित करून घेतलं. मॅटर असा होता की आज पासून लेट येणार्‍या विद्यार्थ्याला दंड केला जाणार होता! मी तर नेहमीच लेट जाणारा! च्यायला म्हटलं काय शाळा आहे का इंजिनिअरिंगचे कॉलेज, मयर्‍या पटकन म्हणाला "शाळा" आणि आम्ही दोघे जोरात हसलो. काय मग, लगेच गाडी मित्राच्या रूमवर लावली आणि मी देखिल कंपाऊंडवरून उडी मारून आत शिरलो. दंड भरणे कधी जमलेच नाही राव आपल्याला! ट्रॅफिक पोलिसला ५-७ किलोमिटर पळवून निसटणारे आम्ही कॉलेजचा दंड भरतोय होय? च्छ्या!!

                आधिच कॉलेज करायचा उत्साह नव्हता म्हणून कॉलेजचे तोंड न बघता सरळ कँटिनमध्ये कोण दिसतय का ते पाहायला स्वारी तिकडे वळाली आणि काय आश्चर्य? ज्याला कँटिन म्हणजे काय? हे तरी ठाऊक आहे का माहित नाही असा आमचा विनू दी टॉपर कँटिनमध्ये चक्क निवांत (कोणत्याही नोट्स हातात न घेता) बसलेला दिसला. म्हणून अतिक्युरियोसिटीने त्याला त्याच्या अशा अबनॉर्मल वर्तनाची चौकशी केली तर कळाले की आज पहिले ३ लेक्चर होणार नाहित कारण मेक. डिपार्टमेंटचे कसले तरी वर्कशॉप आहे. वाह! बेस्ट! तेवढ्यात हिरवळ (समझदारोंको इशारा काफी है) शोधत आमची गॅंगदेखिल कँटिनमध्ये आली.

                सगळीच फ्रेष दिसत होती. कारण हेवी लेक्चर्स कँसल झाली होती ना! मग काय चेष्टा मस्करी चालू झाली. लगेच विषय "आज कुठेतरी जाऊया" वर आला. हा विषय आला की एक पुस्तक लिहून होईल इतकी ठिकाणं सुचवली जातात! एक १५ -२० मिनिटांनी सगळ्यांच एकमत पडलं की सौर्‍याच्या (सौरभ लाडाने सौर्‍या) शेतातल्या विहिरीवर पोहायला जायचं! मी सुरूवातिला नाही म्हणत होतो पण माझ्या नकाराला होकारात कन्व्हर्ट करणे यांना मस्त जमतं. थोडापण वेळ न काढता कोण कोण येणार होते असे आम्ही सगळे कँटिनच्या बाहेर पडलो. आता प्रश्न होता कपड्यांचा.घरी जाणे शक्य नव्हते कारण विनाकारण पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार होता. कारण कॉलेज चुकवून उनाडक्या करणे आणि तेही ऑफिशिअली?इंपॉसिबल! शेवटी अंगावरच कपडे वाळवायचे ठरले! शेत होतं १० मैलावर. बारके-जाडे असे सॉर्टाऊट करून ६ गाड्यांवरून १७ लोक सौर्‍याच्या शेताकडे मार्गस्थ झालो.

                   भर दुपारी ११ वाजता एकामागोमाग एक ६ दुचाकी गच्च कोंबून जाताना पाहून सगळे रस्त्यावरचे का कोणास ठाऊक पण "मंगळावरून आले आहेत की काय" अशा नजरेने बघत होते. एक तर महाशय दुसर्‍या बाजूने जात होते, आम्हाला बघून त्यांनी गाडी वळवली आणि आम्हाला पुन्हा गाठून "काय झालं?" विचारण्यासाठी २-३ किलोमिटर उलटे आले होते! काय लोकं असतात राव!

                  आम्ही सौर्‍याच्या शेताकडे चाललोय हे खुद्द सौर्‍यालाही माहित नव्हतं! तेवढ्यात त्याची आठवण झाली.  :D लगेच त्याला फोन केला आणि बोलावून घेतले.डांबरी रस्ता, मुरमाड रस्ता करत करत कच्चा रस्ता लागला. मग काय, गाडीवरच्या प्रत्येक "एक्स्ट्रा पार्सल" उतरवून चालत यायला लावले, सौर्‍याच्या शेतात शेवटी एकदाचे पोहोचलो. अजून गाडी लावतोय तोच निम्मी मंडळी पाण्यात पोहोचली सुद्धा होती.

                  कसली स्वच्छ विहिर होती! काठापासून साधारण १५ फूटांवर पाणी होते. स्वच्छ हिरवेशार पाणी. दुपारचा सूर्य़ मध्यावर आला असल्याने  पाण्याखाली २०-२५ फुटांपर्यंतचे सगळे अगदी स्पष्ट दिसत होते! एकदम व्यवस्थित बांधिव,५०-६० फुट त्रिज्येची मस्त मोठी स्वच्छ विहीर, बाजूला तोडणीसाठी आलेला ऊस, मोहरलेल्या आंब्याची झाडे, कडत उन असूनही मंद गार वारा आणि आम्ही १८ लोक! जबरदस्त वातावरण.

                सुळक्या, गड्डा उडी, पैजेच्या उड्या, बापरे! किती व्हरायटीने विहिरीत उड्यामारत होतो. सौर्‍या आमच्यातला सगळ्यात धष्टपुष्ट माणूस. त्याने एक गड्डा उडी मारली. गड्डा उडी म्हणजे विहिरिच्या काठावरून विहिरित उडी मारल्यानंतर पाण्यात पडायच्या आधी पाय हातांनी गच्च धरून अंगाचा "C" आकार करून घेतलेली उडी. या उडीमुळे पाणी खुप उडते पण सौर्‍या उडी मारल्यानंतर विहिरित काही पाणी शिल्लक राहिलेय का नाही हे बघायला लागेले इतके पाणी उंच उसळले. आधिच पाण्यात आसलेल्या आम्हाला त्याच्या उडीमुळे तयार झालेल्या लाटा "त्सुनामी" आल्यासारख्या अंगावर आल्या! नाकातोंडात पाणी गेले एवढी भारी उडी होती त्याची!

                   पोहायला न येणारी २-३ लोकंही होते आमच्यात पण तारूण्याच रक्त ते! उतरले विहिरित पण पायर्‍यांवरून. मग त्यांना पोहायला शिकवणे, पाण्यात स्वतःच्या "सो कॉल्ड" स्किल्स दाखवणे, एकमेकांना बुडवणे असले सगळे प्रकार करत करत कधी ३ वाजून गेले कळालेच नाही!हळू हळू एकेकाचा स्टॅमिना संपू लागला. साधारण ३:३० पर्यंत सगळे विहिरितून बाहेर पडले.

                    मग आता कार्यक्रम होता "कपडे वाळवणे" ! मस्त उन पडलेलं त्यात वाहणारा मंद वारा, वाजणार्‍या थंडीने हळूच दात एकमेकांवर आपटायला लावत होता. पण त्यातही मजा होती. शेजारच्या शेतातले मस्त मोठे टुणटुणीत ऊस खात, एकमेकांच्या "सुद्रुढ" शरिरयष्टीची चेष्टा करत करत अर्धा एक तास गेला! पुन्हा व्यवस्थित कपडे घालून तयार होऊन परतिच्या प्रवासाला निघालो. तेवढ्यात का कोणास ठाऊक एकदम "ऊसाचा रस" प्यायची हुक्की आली! लगेच गाड्या रसवंती गृहाकडे वळवल्या! "गृह" कुठले, कापड लावून बनवलेली कुटी. चांगला १२-१५ लिटर रस पिला असेल! ३-३ ग्लास प्रत्येकी! :D

                 त्या रस काढणार्‍या मशिनला लावलेले ते घुंगरू, त्यांचा तो नाद, कडक उनात बर्फ घालून ठसका येईल इतका गोड रस, वाह! कसला सॉलिड दिवस संपत होता! वाटत होते हा दिवस कधी संपूच नये! मनात थोडी भितीपण वाटत होती, कारण एकदा "इंजिनिअर" असा शिक्का लागून बाहेरच्या विश्वात स्वतःचे "स्वत्व" शोधण्यास बाहेर पडल्यानंतर असे मित्रांसोबत हूंदडणे जमेल?पहिली गोष्ट असे मित्र पुन्हा मिळतिल? हा असा दिवस परत आपल्या नशिबी कधी येईल? नकळत डोळे पाणावले. मला तंद्रितून जागं करत राहुल्या म्हणाला, "ए अद्व्या आवर लवकर! पुढच लेक्चर गाठायच आहे ! नाहितर सगळा रस जिरेल HOD पकडला तर!". राहुल्याच्या HOD ला उद्देशुन "अरे-तुरे"च्या बोलण्याने हसु आले. हसत हसत पण मनात कोठेतरी आज मित्रांसोबत घालवलेला एक उनाड दिवस आठवत गाड्या पुन्हा कॉलेजकडे वळाल्या!

यारो हम रहे या ना रहे कल ,  याद आयेंगे ये पल! 

-अद्वैत
मराठी ब्लॉग्स

Thursday, March 10, 2011

आज शेवटचा दिवस!

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आणि मराठी कॉर्नर आयोजित पहिल्याच स्पर्धेला सुंदर प्रतिसाद लाभलेल्या  लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ चा आजचा शेवटचा दिवस! आज म्हणजे दिनांक १० मार्च,२०११ रोजी रात्री १२ पर्यंत सहभागी होणारे लेख या स्पर्धेस पात्र ठरतील. आत्तापर्यंत २० लेख आले सुद्धा! मग कोणाची वाट बघताय? लगेच सहभागी व्हा! प्रत्येक सहभागी सभासदाला ई-सर्टिफिकेट देखिल मिळणार आहेच!
स्पर्धेचे नियम येथे वाचायला मिळतिल: http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=36&t=284

मग होताय ना सहभागी?
-अद्वैत

Tuesday, March 8, 2011

डकवर्थ ल्युईस म्हणजे काय रे दादा?

   भारताच्या द.आफ्रिका दौर्‍यावेळी मी आणि माझा छोटा मामेभाऊ मॅच पाहात होतो. द.आफ्रिकेने बर्‍यापैकी स्कोअर केला होता पण पावसाचा व्यत्यय खुप येत होता. मॅच नॅशनलवर होती त्यामुळे स्वच्छ हिंदित कॉमेंट्री सुरू होती. चेतन शर्मा त्याच्या टिपिकल टोनमध्ये सारखा म्हणत होता ," अब भारत को विकेट निकालनेकी जरूरत है! वरना डकवर्थ ल्युईस लगा तो मुश्किले और बढ जायेंगी....." (ज्यांना त्याचा टिपिकल टोन माहित आहे त्यांना वाचताना मजा येइल). २-४ वेळा तेच तेच तो बडबडत होता, तेवढ्यात माझ्या भावाने विचारले "डकवर्थ ल्युईस म्हणजे काय रे दादा?" झालं! आमच्या दांड्या तिथेच उडाल्या ! मी आपलं त्याला "अरे तो एक नियम असतो रे. पाऊस पडला की लावतात. काही नाही रे, शुद्ध बावळटपणा आहे" असे काहिसे सांगुन गप्प केले. पण त्याचा "डकवर्थ ल्युईस म्हणजे काय रे दादा?" हा प्रश्न मनात घोळत राहिला! आणि नेमका चेतन शर्मा जे काही २ तास ओरडत होता तेच झाले. डकवर्थ ल्युईस लागू झाला आणि भारताला मिळेल्या टारगेटमध्ये ४० रन्सची एकूण भर पडली! तेव्हा माझ्या भावाला कळाले की "डकवर्थ ल्युईस हा निव्वळ बावळटपणा आहे!" :D वाटल्याप्रमाणेच भारत ती मॅच हरला पण त्याने विचारलेला प्रश्न काही केल्या डोक्यातून जाईना. लगेचच नेट उघडले आणि त्या पद्धतीबद्दल सविस्तर जाणून घेतले!

         खर म्हणायचं तर तेव्हा कळाले की "डकवर्थ ल्युईस " हा बावळटपणा नसून खरच छान पद्धती आहे. ही पद्धत इंग्लंडचे दोन अंकशास्त्रज्ञ फ्रैंक डकवर्थ आणि टौनी लुईस यांनी शोधली. म्हणून त्याला "डकवर्थ ल्युईस " म्हणतात. ही पद्धत एका गणिती सुत्रावर अवलंबुन आहे. हे सुत्र फ्रैंक डकवर्थ आणि टौनी लुईस यांनी २००२ साली विकसित केलेल्या एका Resource Table वर आधारित आहे. ती सारणी खालीलप्रमाणे आहे:


 

यावरून असे दिसून येते की ही पद्धत उरलेल्या विकेट आणि ओवर यांच्यावर अवलंबून आहे. ही पद्धत सर्वप्रथम भारत आणि पकिस्तान यांच्यात २००६ मध्ये झालेल्या मॅचमध्ये वापरली गेली ज्यामुळे आपण हातातली मॅच हारलो. ही सारणी कळण्यासाठी मी एक उदाहरण देतो. ते उदाहरण समजून घेतल्यावर तुम्हाला याचा वापर कसा करायचा ते कळेल.

           सगळ्यात आधी डकवर्थ ल्युईस चे सुत्र काय आहे ते पाहू. हे सुत्र S*(R)/१०० असे आहे. यातिल S म्हणजे आधिच्या टिमने बनवलेल्या रन्स; R म्हणजे सारणीवरून मिळणारी संख्या. आता समजा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात सामना होत आहे. समजा ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटिंग करून २४० रन बनवल्या (म्हणूनच म्हणालो समजा :D). मग भारत खेळायला उतरला. साधारण २० ओवर खेळल्यानंतर पाऊस पडू लागला. त्यावेळी भारताची स्थिती १०३ रनवर २ विकेट गेल्या अशी आहे. आता समजा अर्धा तास पाऊस पडला म्हणून डकवर्थ ल्युईस  लावणे भाग पडले. मग आता आपण भारताला राहिलेल्या ओवर मधे काढायच्या रन डकवर्थ ल्युईस  सुत्रवापरून काढू.
S=आधिच्या टिमने बनवलेल्या रन्स २४०
R= उरलेल्या ओवर म्हणजे ५०-२०=३०; आता ३० ओवरची रेषा; गेलेल्या २ विकेटच्या रेषेला जिथे मिळते ती संख्या. म्हणजेच ६७.३.
म्हणून भारतासमोर नवे लक्ष= २४०* (६७.३)/१०० =१६२ रन्स (८ विकेट शिल्लक)

हे एक उदाहरण झाले. आता ह्याचे घडलेले उदाहरण घेऊ. मघाशी सांगितल्याप्रमाणे ही पद्धत सर्वप्रथम भारत आणि पकिस्तान यांच्यात २००६ मध्ये झालेल्या मॅचमध्ये वापरली गेली. त्यावेळी भारताने ४९ ओवर मध्ये ३२८ रन्स केल्या. आणि नंतर पाकिस्तानने ७ विकेट वर ४७ व्या ओवर मध्ये ३११ रन्स केल्या होत्या आणि खराब वातावरणामुळे मॅच थांबली. वास्तविक पाहता पाकला ३ ओवर मध्ये १८ रन काढायच्या होत्या पण डकवर्थ ल्युईस वापरला गेला आणि नवे लक्ष ३०४ दिले. जे त्यांनी आधिच पार केले होते. त्यामुळे भारत ७ रन्सनी हारला.

ही सारणी नेहमी नव्याने बनवली जाते. यात काही नियमही लागू केले आहेत. जसे की हा नियम कमित कमी २० ओवरचा खेळ झाल्याशिवाय वापरला जात नाही वगैरे! पण क्रिकेट हा "अनिश्चिततेचा खेळ" आहे. यात काहिही होऊ शकते. हारता हारता एखादी टिम जिंकूही शकते किंवा जिंकता जिंकता एखादी टिम हारूही शकते! त्यामुळे क्रिकेटसारख्या मनमोहक खेळाला या अशा अंकांच्या जाळ्यात पडलेले पाहून बर्‍याच क्रिकेट प्रेमिंनी या पद्धतीवर जगभरातून टिका केली. एवढ्या टिका झाल्या आहेत की सध्या या पद्धतीला पर्यायी पद्धत शोधण्याचे काम सुरू झाले आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे एक पर्याय आलाही आहे जो एका भारतिय इंजिनिअरने अथक परिश्रमाने निर्माण केला आहे. ICC ने देखिल या नव्या पद्धतीची दखल घेतली आहे आणि त्यांनाही ही नवी पद्धत डकवर्थ ल्युईस पेक्षा मजबूत वाटते आहे. आशा आहे माझ्या पुढच्या लेखापर्यंत ती पद्धत रुजू देखिल होईल.

मग आता कळले ना "डकवर्थ ल्युईस म्हणजे काय ते?" :)

-अद्वैत
introduce yourself

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...